दोन दिवसांपूर्वीच आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबाबत एक गौप्यस्फोट केला होता. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’वर येऊन रडले होते, असं ते म्हणाले. दरम्यान, या दाव्यावरून शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंवर आता राहुल गांधींचा प्रभाव पडतोय, असं ते म्हणाले. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? वीर सावरकर वादानंतर आता काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल?

नेमकं काय म्हणाले दादा भुसे?

आदित्य ठाकरेंची ही केविलवानी धडपड आहे. हा त्यांचा बालीशपणा आहे. त्यांनी ही गोष्ट तेव्हाच सांगायला हवी होती. त्यासाठी ९-१० महिने वाट बघण्याची गरज नव्हती. त्यांना अनेक गोष्टी आता वर्षभरानंतर आठवत आहेत. पण जनतेला हे सर्व समजते, राज्यातील जनता सुज्ञ आहे, अशी टीका दादा भुसे यांनी केली.

आदित्य ठाकरेंवर राहुल गांधींचा प्रभाव

राहुल गांधी ज्याप्रकारे विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. पंतप्रधान मोदींबद्दल चुकीची विधानं करतात. त्याचंच अनुकरण आता छोटे युवराज करत आहेत. हा महाविकास आघाडीच्या संगतीचा परिणाम आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी-उद्धव ठाकरे भेटीवर दिली प्रतिक्रिया

राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे. याबाबतही दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. कोण कोणाची भेट घ्यावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण काँग्रेसला शिंदे-फडणवीस सरकारचा धाक बसला आहे. त्यामुळे त्यांना एकत्र यावं लागतं आहे, असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – “अख्खा काँग्रेस पक्ष आपल्या पाठिशी…”, फडणवीसांच्या विधानावर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ

दरम्यान, अजित पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा केल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याबाबत विचारलं असता, गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळेही काही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.