मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये १३ आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवादही साधला.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्यासंदर्भातल्या १३ आखाड्यांमधले महंत, साधू-संत या सगळ्यांसह बैठक झाली. पुढीला कार्यवाहीबाबत चर्चा झाली. सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं. कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटींच्या विविध कामांच्या निविदा काढल्या आहेत. काही निविदा अंतिम टप्प्यात आहेत. आणखी दोन हजार कोटींच्या निविदा आपण काढत आहोत. गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे, गोदावरी वाहती राहिली पाहिजे या संदर्भातल्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. साधूग्रामची जागा अधिग्रहीत करण्याचा विषय मार्गी लावला आहे. साधू संतांनी जी मागणी केली त्याची नोंद घेण्यात आली आहे.
कुशवार्तवार होणारी अलोट गर्दी टाळण्यासंदर्भातही चर्चा
त्र्यंबकेश्वरातील कुशावर्त या ठिकाणी गर्दी होते, तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल? त्यासंदर्भातली चर्चा झाली आणि बऱ्यापैकी एकमतही झालं आहे. अमृतस्नानाच्या तारखाही घोषित केल्या आहेत. यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणावर पर्वणीच्या तारखा उपलब्ध आहेत. यावेळी जो सिंहस्थ कुंभमेळा जास्त काळ चालणार आहे. त्यामुळे जास्त पर्वणी आल्या आहेत. भाविकांचं योग्य नियोजन करण्याची संधी सरकार म्हणून आम्हाला मिळाली आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शाही स्नान नाही तर अमृतस्नान
साधूग्रामची जागा मागच्या काळात आरक्षित केली होती ती आता अधिग्रहित करायची आहे, त्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल. एसटीपीच्या संदर्भात टेंडर्स पूर्ण झाले आहेत त्यालाही मान्यता दिली जाईल. साधू संतांच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करु. शाही स्नान बंद झालं आहे, आता अमृत स्नान होतं. अमृत स्नान लाखो वर्षांपासून चाललं आहे. पालक मंत्री आणि त्याचा काही संबंध नाही. कुंभ मंत्री आहेत ते सगळं करतील. या जिल्ह्यात गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ सगळे काम पाहतील. आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.