|| चारूशीला कुलकर्णी

ग्राम बाल विकास केंद्र उपक्रम उपयुक्त :- ग्रामीण विशेषत: आदिवासी भागातील बालकांमध्ये असणाऱ्या कुपोषणामुळे आरोग्य विभागाचा सुरू करण्यात आलेला ‘ग्राम बाल विकास केंद्र’ उपक्रम युक्त ठरत आहेत. जिल्ह्य़ात तीन हजारहून अधिक बालके कुपोषित असून त्यांना संदर्भ सेवेसह नियमित औषधोपचार-आहार देण्यात येत आहे. परंतु आशा स्वयंसेविकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका या उपक्रमास बसत असून ही सर्व जबाबदारी आता आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली आहे.

कुपोषणविरोधात शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी ‘ग्राम बाल विकास केंद्र’ (व्हीसीडीसी) उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने काही वर्षांपासून केंद्राची जबाबदारी ग्रामपंचायतीवर निश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचा महिला आणि बाल विभागाचा १५ टक्के निधी, आरोग्य विभागाचा १० टक्के असा २५ टक्के निधी या उपक्रमासाठी वापरला जात आहे. नाशिक जिल्ह्य़ात उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्य़ातील पेठ, हरसूल, सुरगाणा, बाऱ्हे, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, बागलाण, त्र्यंबकेश्वर, नाशिकसह १५ तालुक्यांमध्ये यंदा दोन हजार ७८८ केंद्रे सुरू करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक २९६ केंद्रे बागलाणमध्ये होते. त्या खालोखाल इगतपुरी, तर सिन्नरमध्ये केवळ ३६ केंद्र आहेत. जिल्ह्य़ातील या केंद्रांमध्ये सॅम आणि मॅम प्रकारातील ११ हजार १८६ बालके दाखल झाली. त्यात  आदिवासीबहुल असलेले पेठ (८११), सुरगाणा (६१०), हरसूल (७१५), इगतपुरी (७८७) तसेच दिंडोरीत सर्वाधिक एक हजार ४९१ संख्या होती. त्यांच्यावर कक्षात नियमित औषधोपचार, आहार सेवा दिल्यानंतर सात हजार ९८० बालकांनी टप्पा ओलांडला आहे. मात्र अद्याप तीन हजार २०७ बालके सॅम आणि मॅममधील आहेत. या बालकांना केंद्रांमध्ये पुन्हा दाखल करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कुपोषित बालकांसाठी सध्या सुरू असलेल्या ‘पोषण माह’ अभियानात या बालकांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. अंगणवाडी तसेच गृहभेटीच्या माध्यमातून या बालकांची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. यामध्ये ज्या बालकांना काही त्रास झाल्यास संदर्भ सेवा देत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयातील एनआरसी कक्षात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, आशांचे आंदोलन सुरू असल्याने तूर्तास अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने त्यांचे औषधोपचार, लसीकरणासह, नियमित नोंद घेण्याचे काम सुरू आहे. पुढील टप्प्यात या बालकांना केंद्रांमध्ये सामावून घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली.