मान्सूनच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन तयारीला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत नेहमीप्रमाणे असुरक्षित, मोडकळीस आलेल्या तब्बल ११९२ वाडे, इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. दरवर्षी नोटीसचा सोपस्कार पार पाडला जातो. यावेळी त्यापेक्षा वेगळे काही घडले नाही. दरम्यान, दुसरीकडे मनपाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला असून तो अहोरात्र सुरू राहणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. नाशिक हे बहु धोक्याचे प्रवण शहर आहे. शहराला पुराचा धोका जास्त आहे. आगामी मान्सूनच्या पूर्व तयारीसाठी मनपाने मानक कार्यप्रणाली अद्ययावत केली आहे. सर्व सहा विभागीय कार्यालयांमध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले जातात. मनपा मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा नियंत्रण कक्ष वर्षभर कार्यान्वित आहे. एक जून ते १० ऑक्टोबर या कालावधीत या कक्षात एकूण २६४ कर्मचारी तीन सत्रात कार्यरत असतील.

हेही वाचा >>> नाशिक शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

शहरातील अनेक वाडे धोकादायक स्थितीत आहेत. प्रामुख्याने जुन्या नाशिक भागात अशा वाड्यांची संख्या अधिक आहे. हे वाडे अनेक वर्षांपासूनचे जूने आहेत. अधूनमधून अशा वाड्यांची डागडुजी केली जात असली तरी पावसाळ्यात त्यांना कायमच धोका असतो. अशा वाड्यांमध्ये अनेक जण वास्तव्य करतात. मागील काही वर्षात मुसळधार पावसात जुनाट वाड्यांच्या पडझडीच्या घटना वाढत आहेत. जिवित आणि वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने ठोस उपायांची अमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. पूर परिस्थिती दरम्यान बाधित नागरिकांच्या स्थलांतरासाठी तात्पुरत्या निवासाची ठिकाणे निश्चित केली आहेत. ज्यात शाळा, समाज मंदिरे, सामाजिक सभागृहांचा समावेश आहे. पूर स्थितीमध्ये प्रशिक्षित कर्मचारी सदस्यांची आपत्कालीन बचाव पथके तयार केली आहेत. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून लोकांना सतर्क करण्यासाठी वेळोवेळी पुराची माहिती दिली जाणार आहे.

हेही वाचा >>> मालेगावसह तीन उपविभागीय वन अधिकारी कार्यालयांच्या अधिकारांवर संक्रात – निखिल पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६७ मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई, वाळलेल्या ५२ झाडांची तोड मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून शहरात युध्दपातळीवर नालेसफाई करण्यात आली. ६७ मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई पूर्ण झाली असून ३२ मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई प्रगतीपथावर आहे. शहरात झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचेही काम सुरू आहे. ५२ वाळलेली झाडे तोडण्यात आली आहे. ७४ धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम केले जात आहे. शहरातील विद्युत खांब, वायर जोड, कंट्रोल पॅनलचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त देखभालीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.