नाशिक: मान्सूनपूर्व पावसात शहराची बिकट अवस्था झाली. रस्त्यांवर पाणी आले. खड्डे पडले. गटारी तुंबल्या. सरकारने तीन वर्षांपासून प्रशासकांच्या माध्यमातून नाशिकसह राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये केवळ भ्रष्टाचार केला, असा आरोप शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला.
जवळपास १० दिवसांपासून शहरात दररोज मुसळधार पाऊस होत आहे. प्रमुख रस्ते आणि चौकांना तलावाचे स्वरुप प्राप्त होत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी त्यावर बोट ठेवत महायुती सरकारने महापालिकेत भ्रष्टाचाराची एक खिडकी योजना राबविल्याची टीका केली.. प्रशासकीय राजवटीत सर्वच २७ महापालिकांमध्ये नागरी सुविधांची वाईट स्थिती आहे. प्रशासकांकडून एखादे भरीव कार्य झाले असेल तर, नाशिककरांनी सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.र
सैतानाच्या हाती असणारी लोकप्रतिनिधींची सभागृहे लोकांच्या हाती द्यावीत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आदेश दिले आहेत. सत्ताधारी मतदान यंत्रांची तयारी झाल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना काढली जाईल, असा टोला राऊत यांनी हानला.
सिंहस्थ निधीसाठी पालकमंत्रीपदाचा वाद
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून गिरीश महाजन आणि मालेगावचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री यांच्यात वाद सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी १० ते १५ हजार कोटींचा निधी मिळणार आहे. प्रत्यक्ष कामावर किती खर्च होतील, हा प्रश्न आहे. कारण, यातील जास्तीत जास्त वाटा हाती यावा आणि तो निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी वापरता यावा, असा उभयतांचा प्रयत्न आहे त्यांच्या विचारांची पातळी यापलीकडे नसल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.
साधू-महंत कधी भूमिका घेणार ?
कुंभमेळ्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जी साठमारी सुरू आहे, त्यावर साधू, महंतांनी भूमिका घेतली पाहिजे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. सिंहस्थाच्या तारखा जाहीर न झाल्याने साधू-महंतांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नावर राऊत यांनी संबंधितांनी खरेतर कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर नाराजी व्यक्त करायला हवी. हिंदू धर्माचे साधू-महंत हे मार्गदर्शक आहेत. ते समाजाला दिशा देतात. अशा गोष्टी सहन करणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगायला हवे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या पापाचे त्यांनी वाटेकरी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.