शहरातून जाणाऱ्या लांबलचक उड्डाण पुलावर जाण्यासाठी वाहनधारकांसाठी केलेली व्यवस्था काही ठिकाणी दगड लावून बंद केली गेली असली तरी त्याचे फलक आजही सव्र्हिस रस्त्यांवर ‘जैसे थे’ असल्याने अंधारात अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले. अपघात झाला की, तात्पुरते उपाय करून राष्ट्रीय महामार्ग विभाग मलमपट्टी करतो. परंतु, त्यामुळे मूळ प्रश्न काही दूर होत नाही. पुलाची बांधणी करताना शहरातून पुलाशी जोडणारे काही रस्ते तयार करण्यात आले. कालांतराने त्याच ठिकाणी वाहतूक कोंडी आणि दुचाकी वाहनधारक पुलावर घुसखोरी करत असल्याचे लक्षात आल्यावर काही मार्ग बंद करण्यात आले. पाथर्डी फाटय़ाच्या अलीकडचा मार्ग बंद करताना त्याचे फलक काढण्याची तसदी घेतली गेली नाही.
मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणात तयार करण्यात आलेला उड्डाण पूल जवळपास सहा किलोमीटर अंतराचा आहे. या पुलावरून बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांनी थेट मार्गस्थ व्हावे, असा उद्देश आहे. शहरातून उड्डाण पुलावर जाण्यासाठी द्वारका, क. का. वाघ महाविद्यालयासमोर, भुजबळ फार्म आणि पाथर्डी फाटय़ाच्या अलिकडील बाजूला जोड रस्ते तयार करण्यात आले. मात्र, या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. द्वारका चौकातील जोड रस्त्याचा काही भाग प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनधारकांनी व्यापला आहे. वास्तविक उड्डाण पुलावरून केवळ चारचाकी व अवजड वाहनांना वाहतुकीची परवानगी आहे. परंतु, जोड रस्त्यावरून दुचाकी वाहनधारक घुसखोरी करत असल्याने काही अपघाताच्याही घटना घडल्या.
उड्डाण पुलावर जाण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होते. या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असल्याने प्राधिकरणाने यावर उपाय म्हणून ज्या ठिकाणी उड्डाण पूल खालील मुख्य रस्त्याला जोडला गेला, त्या ठिकाणी दगड लावून तो बंद केला. पाथर्डी फाटय़ाच्या अलिकडील बाजुला असणारा हा जोड रस्ता त्याचे उदाहरण. उड्डाण पुलास जोडणारा रस्ता बंद करण्यासाठी दगड रचण्यात आले. जेणेकरून वाहनधारकांना तिथून वर जाता येणार नाही. हा उपाय योजताना प्राधिकरणाचे सव्र्हिस रस्त्यावरील फलकाकडे दुर्लक्ष झाले. म्हणजे उड्डाण पुलावर जाणारा रस्ता बंद असला तरी तो मार्ग दर्शविणारा फलक तसाच आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनधारकांना त्याची कल्पना असणे अवघड आहे. रात्रीच्या अंधारात फलक पाहून कोणी वाहन त्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केल्यास अपघातदेखील घडू शकतो. या अडथळ्यामुळे पुलावर जाण्यापासून दुचाकीस्वारांचा काही अंशी रोखण्यात यश मिळाले. मात्र, या फलकामुळे वाहनधारकांचा गोंधळ होतो. रात्रीच्या अंधारात ही बाब वाहनचालकांसाठी घातक ठरू शकते. रात्री पुलावर पथदीप असले तरी सव्र्हिस रस्त्यावर उड्डाण पुलामुळे काहीसा अंधार असतो. यामुळे समोरील अडथळे न दिसल्यास अपघात घडू शकतात, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने या महामार्गाचे विस्तारीकरण करताना अनेक घोळ घातल्याचे आरोप झाले. रासबिहारी चौक व आदी भागात सातत्याने अपघात घडत असूनही तिथे उपाय करण्याकडे कानाडोळा केला जातो, अशी स्थानिकांची तक्रार आहे.