मनमाड : राज्यात घडलेल्या सत्तांतर नाटय़ानंतर मनमाड शहर आणि परिसरातील एकनिष्ठ शिवसैनिकांनी मुंबई  येथे मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले. नांदगाव मतदारसंघातील आमदार सुहास कांदे हे एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष होते. या वेळी ठाकरे यांनी कुणालाही घाबरू नका, पक्षाचे काम निष्ठेने करण्याची सूचना शिवसैनिकांना केली.

मुंबई येथील भेटीत शिवसेना पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. संबंधितांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही बाळासाहेबांबरोबर आणि त्यानंतरही आपल्याबरोबर हिंदूत्वाचा आणि शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठेने कार्य करीत आहोत. यापुढेही करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी मनमाडच्या शिवसैनिकांशी संवाद साधत तुमच्यासारख्या तळागाळातील शिवसैनिकांच्या पािठब्यावरच शिवसेना उभी असल्याचे नमूद केले. सध्या तुम्हाला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही. पण मी तुमचाच असून सदैव तुमच्या सोबतच राहीन. यापुढे कोणालाही घाबरू नका, शिवसेनेचे काम निष्ठेने करत राहा, बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्वाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार राजाभाऊ देशमुख, अल्ताफ  खान, संतोष बळीद, गणेश धात्रक, दिलीप सोळसे, सुनील पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी अरिवद सावंत, सुनील बागूल, आमदार नरेंद्र दराडे हेही उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.