मनमाड : इंधन टँकर चालकांनी संप मागे घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पानेवाडीस्थित इंधन प्रकल्पांमधून बुधवारी रात्रीपर्यंत राज्यातील १६ जिल्ह्यांत सुमारे १४०० टँकरमधून पेट्रोल, डिझेल पाठविण्यात आले. सर्व १६ जिल्ह्यातील अनुशेष भरून निघण्यास ४८ तासांचा कालावधी लागणार असून त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, कुठेही टंचाई जाणवणार नाही, असा दावा इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. संप मिटल्यानंतर बुधवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील इंधन टंचाई पूर्णपणे दूर होऊ शकली नाही. अनेक भागात निम्मे पंप बंद राहिले. इंधन प्रकल्पातून टँकरमधून वितरण सुरू झाले असून वेगवेगळ्या भागात ते पोहचण्यात काही अवधी लागणार आहे. मंगळवारी दुपारपासून बुधवारी दिवसभरात तीनही प्रकल्पांमधून सुरळीतपणे टँकरमध्ये इंधन भरले जात आहे. कुठेही कोणताही अडथळा आलेला नाही. कंपनी, वितरक आणि वाहतूकदारांचे सर्व टँकर भरले जात आहेत. ज्या टँकर्सचा क्रमांक आला, पण चालक संपामुळे बाहेर गेले होते. त्यांनाही प्राधान्याने टँकर्स भरून देण्यात आले. तीनही प्रकल्पात अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. इंधन वितरणाचे काम अथकपणे सुरू असून पुढेही सुरू राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे १४१५ टँकरमधून राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रासह सर्व १६ जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल सुरळीतपणे पाठविता आल्याचे नागापूर इंधन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नाना पाटील यांनी म्हटले आहे. हेही वाचा. नाशिक : नांदगाव तालुक्यात शस्त्रांसह तिघे ताब्यात लवकरच स्थिती पूर्वपदावर सर्व १६ जिल्ह्यांतील टँकर्सचा अनुशेष येत्या ४८ तासात पूर्ण केला जाईल व त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल. कोठेही टंचाई जाणवणार नाही, अशी माहिती भारत पेट्रोलियमचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत खर्गे, इंडियन ऑईलचे व्यवस्थापक धिरज कुमार, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक शशांक भदाणे दिली आहे. हेही वाचा. Maharashtra News Live : “चतुर्थीच्या दिवशी मटण खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”, अंबादास दानवेंचा भाजपाला टोला इंधन साठवणूक प्रकल्प व तुर्भे-पानेवाडी इंधन वाहिनी ज्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनची आहे, त्या कंपनीत मंगळवारी १५६, तर बुधवारी ३०० असे एकूण ४५६ टँकर्समधून पेट्रोल व डिझेल भरून राज्यांतील विविध जिल्ह्यांत पाठविण्यात आले. त्यासाठी मंगळवारी रात्री ११ पर्यंत तर बुधवारी पहाटे सहावाजेपासून रात्री उशिरापर्यंत टँकर्समध्ये इंधन भरण्याचे काम सुरू होते. - प्रशांत खर्गे (प्रादेशिक अधिकारी, बीपीसीएल)