येवला तालुक्यात १७ गावांना टँकरने पाणी नाशिक : एप्रिलच्या मध्यावर उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट गडद होण्यास सुरूवात झाली आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात १७ गावे आणि २५ वाडय़ांना १३ टँकरने पाणी पुरविले जात आहे. ही सर्व गावे येवला तालुक्यातील आहेत. आदिवासीबहुल दुर्गम पाडय़ांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून कुठे पाणी मिळेल यासाठी भटकंती सुरू झाली आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये दरवर्षी काही तालुक्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. टँकरमुक्त गावांच्या आजवर अनेकदा घोषणा झाल्या असल्या तरी चित्र फारसे बदलले नाही. या वर्षी पुन्हा त्याची प्रचिती येत आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाण्यातील दुर्गम भागात पाडय़ालगतच्या विहिरींनी तळ गाठल्यावर स्थानिकांचा मोर्चा आसपासच्या ज्या विहिरीत पाणी असेल तिकडे वळतो. डोक्यावर हंडे घेऊन डोंगर चढ-उतारापासून कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. प्राचीन कालापासून अस्तित्वात असलेल्या विहिरीतील पाणी अशाप्रसंगी वापरले जाते. येवला, नांदगाव, सिन्नर तालुक्यास टंचाईला तोंड द्यावे लागते. गेल्या वर्षी पाऊस समाधानकारक होता. धरणांमध्ये पाणी असल्याने पाणी पुरवठा योजना वा मोठय़ा शहरांना अद्याप टंचाईची झळ बसलेली नाही. महापालिकेने पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. मागील काही दिवसात येवला तालुक्यातील १७ गावे आणि २५ वाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार प्रशासनाने आधी पाच गावांसाठी तीन टँकर आणि आता १२ गावे आणि २५ वाडय़ांसाठी १० टँकर मंजूर केले आहेत. मंगळवारपासून संबंधित गावांना पाणी पुरवठा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. टँकर मंजुरीला गती करोना काळात टँकर मंजुरीतील विलंब टाळण्यासाठी मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गाव, वाडय़ानिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात टँकर उपलब्ध करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हास्तरीय यंत्रणा करोनाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे टँकर मागणीच्या प्रस्तावांना त्वरित मंजूरी देण्यात विलंब लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन टँकर मंजुरीचे अधिकार तालुकानिहाय उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तलाठी, ग्रामसेवकांना टँकरच्या फेऱ्या, किती क्षमतेने पाणी दिले आदींचा तपशील द्यावा लागणार आहे.