जळगाव - जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने टंचाईचीही तीव्रता वाढणार आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाला एक-दीड महिना उशिरा सुरुवात होण्याचे संकेत आहेत. मात्र, आतापासूनच टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून, सद्यःस्थितीत १३ गावांना १४ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. ४० गावांसाठी ४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच सद्यःस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठा असल्याने जिल्हा प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा जळगावकरांना टंचाईला सामोरे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. जूनमध्ये पाण्याचे संकट घोंगावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर तालुक्यातील सर्वाधिक चार गावांत टँकरद्वारे पाणी पुरविले जात असून, १७ गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मोरगाव, रोटवद, नेरी दिगर, किन्ही (ता. जामनेर), तळबंदतांडा, हनुमंतखेडा, खेडीढोक (ता. पारोळा), वसंतवाडी (ता. भडगाव), ऐनगाव (ता. बोदवड), पिंपळगाव (ता. चाळीसगाव), रामेश्वर (ता. पाचोरा), कंडारी, कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) या गावांना १४ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. हातगाव, लोणवाडी बुद्रुक येथे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. हेही वाचा - “९० दिवसांत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नाही घेतला, तर…”, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा मुक्ताईनगर तालुक्यातील आठ गावांमध्ये नऊ, पारोळा तालुक्यातील तीन, पाचोरा तालुक्यात चार विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.सद्यःस्थितीत जिल्ह्यातील तीन प्रमुख धरणांमध्ये जिवंत साठा ४४.९२ टक्के आहे. गतवर्षी हाच साठा ५०.८८ टक्के होता. जळगावकरांची तहान भागविणार्या वाघूर धरणात गतवर्षी ७७.२६ टक्के साठा होता. तो यंदा ६९.२१ टक्के आहे. गिरणा धरणात गतवर्षी ३९.९९ टक्के साठा होता. त्यात घट होऊन २८.४८ टक्के साठा आहे. हतनूर धरणात यंदा ५४.९० टक्के साठा असून, गतवर्षी ४७.५३ टक्के साठा होता. जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, सुकी, अभोरा, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, मंगळूर, बहुळा, मोर, अंजनी, गूळ या १३ मध्यम प्रकल्पांत यंदा ३६.३१ टक्के साठा आहे. गतवर्षी तो ३५.९५ टक्के होता. यंदा बोरी प्रकल्प कोरडेठाक आहे. गतवर्षी या प्रकल्पात १५.३५ टक्के साठा होता. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांमध्ये अवघा ४५ टक्के जलसाठा आहे. आतापासूनच जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्याची गरज असून, अन्यथा धरणांचा जलसाठा जूनमध्ये संपुष्टात आल्यास टंचाईची भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - अंमली पदार्थमुक्त जिल्हा, बाल विवाह रोखण्यासाठी मदतवाहिनी; नंदुरबार जिल्हा पोलिसांची तयारी निम्म्या लघु प्रकल्पांत ठणठणाट जिल्ह्यात २६ लघु प्रकल्प असून, त्यातील १३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. यात हातगाव-१, खडकेसीम, पिंप्री, वाघळा-१, ब्राह्मणशेवगा, पिंपरखेड, कुंझर, वाघळा-२, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळीभोरस, पथराड, कृष्णापुरी, निसर्डी, आर्डी, म्हसवा, कंकराज, शिरसमणी, पिंपळकोठा भोला, सावरखेडा, बोळा, मन्यारखेडा, विटनेर, पद्मालय, खडकेसीम यांचा समावेश आहे. गतवर्षी लघु प्रकल्पांमध्ये ६.०१ टक्के साठा होता. तो सद्यःस्थितीत अवघा एक टक्का आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांत गतवर्षी एकूण साठा ४७.०८ टक्के होता. तो सद्यःस्थितीत ४२.२१ टक्के आहे.