स्वच्छतेचा पुरस्कार नावावर असलेल्या गृहनिर्माण संस्था खूपच कमी सापडण्याची शक्यता आहे. स्वच्छ भारत अभियानात या ना त्या माध्यमातून सहभाग घेऊन देशाला उन्नतीच्या मार्गावर ठेवण्याचे प्रयत्न शहरातील गृहनिर्माण संस्थाही करू शकतात, हे काही संस्थांनी दाखवून दिले आहे. यात ऐरोलीतील सेक्टर-१५ मधील दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेने स्वच्छता आणि नीटनेटकेपणाचा पुरस्कार पटकावला आहे. एका खासगी बँकेने राबवलेल्या अभियानात ‘दर्शन’च्या रहिवाशांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. दर्शन को-ऑप. हौसिंग सोसयटी, सेक्टर १५ ऐरोली ‘दर्शन’च्या रहिवाशांनी सोसायटीतील पार्किंगची सोय केली आहे आणि प्रत्येकाच्या सहकार्यातून येथे वाहनांची व्यवस्था केली जाते. यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. सोसायटीचे अध्यक्ष श्यामलाल रंजक यांच्या नेतृत्वाखाली ही व्यवस्था पाहिली जाते. पाण्यासाठीची उत्तम सोयही या संस्थेने केली आहे. पाणीपुरवठय़ासाठी भूमिगत टाक्या आणि छतावरील टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यांची नियमित स्वच्छता केली जाते. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे नियमित वर्गीकरण करण्यात येते. त्यामुळे पालिकेच्या कचरा वर्गीकरणात या संस्थेने अगदी शंभर टक्के योगदान दिले आहे. कधी काळी नवी मुंबईत सिडकोचे घर घेण्यासाठी थोडा विचार केला जात होता. दळवळणाच्या दृष्टीने नवी मुंबई त्रासदायक समजली जात होती. लोकांचा ओढा सिडकोच्या घरांपेक्षा मुंबईतील म्हाडाला होता. कलांतराने स्थितीत फरक पडत गेला. वाहतूक व्यवस्था सुधारली आणि लोकांनी सिडकोच्या घरांच्या सोडतीचा लाभ उठविण्यास सुरुवात केली. याआधी सिडकोच्या घरांची दयनीय अवस्था झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे; परंतु नवी मुंबईतील काही सिडकोच्या काही गृहनिर्माण संस्था उत्तम अशा अवस्थेत आहेत. संस्थेतील रहिवाशी स्नेहभाव आणि जिव्हाळा जपत स्वच्छतेचे व्रत हाती घेतले आहे. संस्थेच्या आवारात प्रवेश केल्यानंतर स्वच्छतेचा हा वसा मन प्रसन्न करतो. ऐरोली सेक्टर-१५ येथे सिडकोच्या इमारती आहेत. त्यातील ‘दर्शन’ ही एक. ऐरोली रेल्वे स्थानकापासून २० मिनिटांच्या अंतरावर ही संस्था आहे. संस्थेच्या शेजारीच ‘जॉगिंग ट्रॅक’ आहे. त्यामुळे संस्थेच्या जवळच चालती पावले असतात. या परिसरातील शांतता हा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘दर्शन’च्या संकुलात चार मजली सहा इमारती आहे. संस्थेत एकूण ९२ सदनिका आहेत. १९९५ पर्यंत बांधून पूर्ण केलेल्या संस्थेमध्ये सिडकोची ‘वन रूम किचन’ची घरे होती. २००४ मध्ये जादा एफएसआय घेऊन शयनगृह आणि हॉल आणि स्वयंपाकघर अशी रचना असलेली घरे बांधण्यात आली. संकुलातील इमारतींचे २०१४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. दर सहा वर्षांनी इमारतींना रंग काढण्यात येतो. पावसाच्या पाण्याचा मारा टाळण्यासाठी इमारतींच्या वर पत्र्यांचे शेड टाकण्यात आले आहेत. इमारतींमध्ये पुरेशी जागा असल्याने सुटसुटीतपणा इथे पाहायला मिळतो. विशेष म्हणजे सर्वधर्मसमभाव ही या संकुलातील संस्कृती आहे. सर्वाच्या सुखदु:खात सहभागी होण्यासाठी इथे प्रत्येक रहिवाशी तयार असतो. ‘दर्शन’चा तो लौकिकही आहे. संस्थेच्या आवारात कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. होळीला आनंदाने रंग उधळले जातात. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन केले जाते, तर याच दिवशी सत्यनारायण घातला जातो. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेत महिलांचे चार बचत गट आहेत. याशिवाय रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. समाजभान संस्थेच्या परिसरात भरपूर मोकळी जागा असल्याने सुट्टीच्या दिवसात बच्चे कंपनीचे मैदानी खेळही रंगतात. पण फुटबॉल, क्रिकेट सारखेखेळ खेळण्यास मज्जाव केला जातो. सोसयटीमये अशोका, नारळ, बदाम, उंबर आदी झाडे आहेत. मुलुंड-ऐरोली पुलाच्या बांधणीनंतर ऐरोली सेक्टर १५चा विकास खऱ्या अर्थाने होण्यासा सुरुवात झाली. संस्थेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांचा पहारा असतो. सुरक्षेचा उपाय म्हणून संस्थेत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. इमारतींभोवती तारेचे कुंपण आहे. वर्षांतून एकदा येथे स्वच्छता अभियाना राबविण्यात येत असल्याचे संस्थेचे सल्लागार नामदेव कुंभार यांनी सांगितले. आरोग्याच्या दृष्टीने सोसायटीत कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. दिवाळीत येथे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडण्यात येत नाहीत.