अलिबाग- निसर्ग वादळामुळे खंडीत झालेला वीज पुरवठा अखेर सुरळीत झाला आहे. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील गावांमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्याला बसला. अलिबाग, पनवेल, कर्जत, उरण, खालापूर, पेण, रोहा, मुरुड, तळा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर व श्रीवर्धन तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत झाला. या परीसरातील वीज वितरण यंत्रणा पुर्णपणे उध्वस्त झाली. ३२ स्विचिंग उपकेंद्र , २६१ फीडर , १९७६ गाव, ६७७३ वितरण रोहित्र , ७०१५ उच्चदाब खांब, १४,८६५ लघुदाब खांब वादळाच्या तडाख्यात सापडले. या नुकसानामुळे १० लाखाहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करणे मोठे आव्हान होते. कारण बहुतांश वीज वाहिन्यांचे जाळ वादळात उध्वस्त झाले होते. पुन्हा नव्याने सर्व यंत्रणांची उभारणी करणे गरजेचे होते. अलिबाग, पनवेल, पेण, महाड, सुधागड, पोलादपूर येथील विज पुरवठा टप्प्याटप्याने सुरु करण्यात आला. यासाठी बाहेरून मनुष्यबळ बोलविण्यात आले. मात्र

गोरेगाव, म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माणगाव, तळा, मुरुडचे काम अत्यंत कठीण व कसोटीचे होते. डोंगरदर्यात कोसळलेले खांब, खाडीतून जात असेलेले खांब, घनदाट जंगलातून, दलदलीतून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पायपीट करून विजेचे ३५०-४०० किलो वजनाचे खांब डोंगरदऱ्यातून  खांद्यावर वाहून नेणे सोपे नव्हते, परंतु गावकरी आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या मदतीने हे अवघड काम पूर्ण करता आले. टाटा पॉवर, अदानी पॉवर कंपन्यांचे कर्मचारी मदतीला धावून आले. करोना वाढता प्रादुर्भाव आणि पावसाची संततधार यामुळे दिवसेदिवस हे काम करणे जिकरीचे होत गेले. मात्र असंख्य अडचणीवर मात करून दोन महिन्यानंतर सर्व गावांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

आव्हानांना, संकटांना सामोरे जाण्याची ऊर्जा असेल, समस्यांचा अंधार कितीही गडद असो, तिथे यशाचा लख्ख प्रकाश पडतोच, जो इतरांनाही सकारात्मक ऊर्जेची महती पटवून देतो. खंडीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत कऱणे सोपे नव्हते, असंख्य अडचणी होत्या, मात्र त्यावर करत महावितरणच्या अधिकारी कर्मचारी यांनी हे यश संपादित केले आहे.
– पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता, महावितरण