नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी सिडकोवर उद्या मोर्चा

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास स्व. दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवार, २४ जून रोजी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या वाहतूक बदलासाठी सुचवलेले बरेच मार्ग खड्डेमय आणि अरुंद असल्यामुळे गुरुवारी अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव पारित झाला असला तरी भाजप, आरपीआय तसेच बहुतांश स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी विमानतळास स्व. दि बा पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी २४ जून रोजी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची तयारी पाहता मोठय़ा प्रमाणावर जनसमुदाय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सिडको कार्यालय परिसर २४ तारखेला सकाळी आठ ते रात्री १२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता बंद केला आहे.

जड व अवजड वाहनांना सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तसेच शीव पनवेल आणि ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. मोर्चात मोठय़ा प्रमाणात पोलीस मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात असल्याने पोलीस बळ याच ठिकाणी एकवटले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस उपलब्ध होतील याची शाश्वती नाही.

बाहेरगावच्या प्रवाशांचे हाल

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व गोवा राज्यात जाणाऱ्या प्रवासी बस या काळात बंद असतील. याचा सर्वात मोठा फटका पहाटे व सकाळी सकाळी येणाऱ्या वाहनांना बसणार आहे. सकाळी ८ नंतर येणाऱ्या वाहनांना रात्री पर्यंत पनवेल येथेच थांबावे लागेल. त्यांना वळण मार्गावर सोडल्यास वाहतूक कोंडीत भर पडू शकते अशी शक्यता विक्रम साठे या खासगी प्रवासी वाहतूकदाराने व्यक्त केली.

३ ते ८ कि.मी. चा अतिरिक्त प्रवास

मुंबईहून येणारी वाहने ऐरोली मार्गे महापे पुढे शीळ फाटा व नंतर कळंबोली मार्गे पुढे जाणार आहेत. पनवेल मार्गे मुंबईला जाणाऱ्या गाडय़ांचा प्रवास मार्गही असाच असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना किमान ७ ते ८ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे. तसेच नवी मुंबईतून पनवेलला व पुढे पुण्याला जाण्यासाठी वाशी कोपरखैरणे महापे शीळ फाटा व कळंबोली सर्कल असा मार्ग असणार आहे. याही मार्गावरील प्रवास ३ ते ८ किलोमीटपर्यंत वाढणारा आहे.

खराब रस्त्यांचा फटका 

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी तळोजा एमआयडीसी- रोडपाली मार्गे शीळ फाटा – महापे, ऐरोली आणि पुढे मुंबईत असा मार्ग बदल आहे. रोडपाली भागात काही ठिकाणी रस्ते खराब असून रस्ताही वाहनांच्या तुलनेत अरुंद असल्याने वाहतूक कोंडी अटळ आहे.

‘राज ठाकरे यांनी आडकाठी आणू नये’

विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा अधिकृत निर्णय-ठराव झालेला आहे. अशा परिस्थितीत या विमानतळ नामकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आडकाठी आणू नये, अशी टीका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते  अरविंद सावंत यांनी केली आहे. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी सूचना करत राज ठाकरे यांनी केली आहे.

अवजड वाहनांना ठाण्यात रोखणार

भिवंडी, गुजरात येथून हजारो अवजड वाहने नवी मुंबईतील उरण जेएनपीटीच्या दिशेने जात असतात. या आंदोलनामुळे शहरात अवजड वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात गुरुवारी सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी अवजड माल वाहतूकदारांना गुरुवारी विनाकारण रस्त्यावर वाहने न काढण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुजरात येथून ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना गायमुख परिसरात रोखण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कोपरी येथून जाता येणार आहे. त्यामुळे या भागात वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

शीळ फाटय़ावर सर्वाधिक ताण

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक ताण हा शीळ फाटय़ावर पडणार आहे. शीळ फाटय़ावरून मुंबई पुणे मार्गावर धावणारी ऐरोली व शीव पनवेल मार्गावरील किमान १५ हजार गाडय़ांचा अतिरिक्त भार पडू शकतो. शीळ फाटा आधीच सर्वाधिक व्यस्त रस्ता असून नाशिक गुजरातला जोडणारा मार्ग आणि एमआयडीसीडी वाहने मोठय़ा प्रमाणात असतात त्यात हजारो वाहनांची भर पडणार आहे.

जड अवजड वाहनांना बंदी असल्याने ही वाहने रस्त्यावर नसतील. सर्व पर्यायी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता कमी आहे. या बाबत सर्व स्तरावर माहिती देण्यात आल्याने वाहने नेहमीच्या संख्येने रस्त्यावर उतरणार नाहीत.

 – पुरुषोत्तम कराड, पोलीस  उपायुक्त, वाहतूक विभाग