ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रस्ताव आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) पाच घाऊक बाजारपेठांत दररोज निर्माण होणाऱ्या ६० मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. राज्य सरककारने १०० किलोपेक्षा जास्त कचरा तयार होणाऱ्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना स्वंतत्र घनकचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात एपीएमसीमध्येच सर्वाधिक कचरा तयार होत आहे. पहाटे दोनपासून एपीएमसीतील कारभाराला सुरुवात होते. तो दुपारी संपुष्टात येतो. या वेळेत ६० टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. दिवसाला हजारो वाहने व व्यापाऱ्यांची ये-जा असल्याने तीन-चार हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ओला आणि सुका कचरा ही एपीएमसीसाठी डोकेदुखी ठरली आहे. मागील काही वर्षांपासून पालिकेने येथील घनकचरा वाहतूक सुरू केली असून तुर्भे येथील कचराभूमीवर या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. राज्य सरकारने नुकतेच राज्यातील सहकारी सोसायटी व कृषि उत्पन्न बाजारा समितीत १०० किलोपेक्षा जास्त घनकचरा निर्माण होत असल्याने त्या कचऱ्याची त्या त्या संस्थांनी विल्हेवाट लावावी असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे एपीएमसी प्रशासन त्याकामी लागले असून स्विसप्रणालीनुसार हे काम दिले जाणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रस्ताव आहे. स्विस चॅलेन्जप्रणालीनुसार हा कचरा कंत्राटदारीला देण्याच्या बदल्यात तो ती वीज विकणार आहे. या प्रस्तावाला पणन विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानतर त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. एपीएमसीतील अस्वच्छतेकडे प्रशासनाचे तर दुर्लक्ष होतत आहेच पण पालिकाही त्यावर कोणतीच कारवाई करत नाही असे दिसते. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावण्याची आवश्यकता आहे.