अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईचा शेतमालांवर परिणाम; आवक २५ टक्क्यांनी घटली

राज्यात परतीच्या पावसाने ओढ घेतल्याने अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईचा परिणाम शेतमालांवर होऊ लागला असून ऑक्टोबर हिटमुळे भाज्यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास येत्या महिनाभरात भाज्यांची दुप्पट दरवाढ होण्याची शक्यता आहे. भाज्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाटाण्याने तर शंभरी पार केली असून तुर्भे येथील घाऊक बाजारात बुधवारी भाज्यांची आवक २५ टक्क्यांनी घटली आहे. येत्या महिनाभरात भाज्यांचे भाव आणखी कडाडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई व आजूबाजूच्या भागाला दररोज हजारो टन भाजीपुरवठा करणाऱ्या पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाची स्थितीही नाजूक आहे. पुण्यातील आंबेगाव, जुन्नरसारख्या तालुक्यांत परतीच्या पावसाने पाठ फिरवली आहे. उष्णतेमुळे वाहतुकीदरम्यान भाज्या सडत आहेत. त्यामुळे मुंबईला भाजीपुरवठा कमी होत आहे.

तुर्भे येथील घाऊक बाजारात येणाऱ्या भाज्यांनी किरकोळ बाजारात तर पन्नाशी कधीच पार केली असून वाटाणा १०० रुपये किलोने विकला जात आहे. घाऊक बाजारात तो ६० ते ७० रुपये किलोने मिळत आहे. हीच स्थिती इतर भाज्यांची असून पुढील महिना-दीड महिना भाज्यांची दरवाढ आणखी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दरवाढ ४० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पश्चिम व उत्तर राज्यातून येणाऱ्या भाजीत या आठवडय़ात घट होऊ लागली असून भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास ही दरवाढ ४० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गुजरात व मध्य प्रदेश येथून मोठय़ा प्रमाणात भाज्यांची आवक सुरू झाल्यानंतर ही दरवाढ आवाक्यात येईल.

– कैलाश तांजणे, अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक भाजीपाला महासंघ, तुर्भे