पनवेल : पनवेलकरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानूसार आयोजित केलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ ची प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी सहभागी होऊन स्वच्छतेविषयी शहरवासीय गांर्भियाने विचार करत असल्याचे शनिवारी सकाळी दाखवून दिले. अतिवृष्टीमुळे प्रभातफेरी होणार की नाही अशी साशंकता होती. परंतू पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अखेर शनिवारी पावसापूर्वीच खारघर, कळंबोली आणि पनवेल शहरात प्रभातफेरी निघाली.

आयुक्त देशमुख यांनी वेधशाळेतून हवामानाचा अंदाज घेत शनिवारची नियोजित फेरी आयोजित केली होती. केंद्र सरकारतर्फे ‘स्वच्छ अमृत महोत्सवाचे आयोजन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान होत असून ‘इंडियन स्वच्छता लीग’स्पर्धा ही त्यापैकी एक आहे. शनिवारी खारघर वसाहतीमध्ये सायकल फेरी, कळंबोली आणि पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीगच्या’ रॅलीमध्ये तरूणांसह विद्यार्थ्यांची आणि पालिका कर्मचारी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी सहभागी झाल्याचे दिसले. मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले होते या दरम्यान पाऊस आला तरी हातात छत्री घेऊन प्रभात फेरी कळंबोलीत पुर्ण करण्यात आली.

हेही वाचा : नवी मुंबई : रात्रीपासून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी १० वाजणार

यावेळी स्वच्छतेविषयी संकल्प करीत सामुहिक शपथ आयुक्तांनी सर्वांना दिली. या फेरीत आमदार प्रशांत ठाकूर आणि विविध राजकीय पक्षातील माजी नगरसेवक आणि पनवेलमधील प्रसिध्द आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष या सामिल झाल्या होत्या. ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेने ‘पनवेल चॅम्पियन्स’ हा संघ तयार केला असून टेबल टेनिसपटू घोष ही या संघाची कर्णधार आहे.