सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय व शासकीय कर्मचारी वसाहत निर्मितीचा अनुभव सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय व शासकीय कर्मचारी वसाहत निर्मितीचा अनुभव असणाऱ्या सिडकोवर राज्य शासनाने आता ठाणे जिल्हय़ातून वेगळा केलेल्या पालघर जिल्ह्य़ाचे मुख्यालय अन्य कार्यालय व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने बांधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील २९ गावांचा सहभाग असणाऱ्या नवी मुंबई शहर निर्मितीची जबाबदारी सिडकोने वीस वर्षांपूर्वी पार पाडली आहे. शहरांचे शिल्पकार असे बिरुदावली घेऊन शहर निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या शासनाची उपकंपनी असलेल्या सिडकोवर नवीन जिल्हानिर्मितीचे काम सोपविण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील दक्षिण टोक असलेल्या पालघर भागातील शासकीय जमिनींचा विकास करण्याचे धोरण सिडको राबविणार आहे. यापूर्वी सिडकोने औरंगाबाद येथे १२०० हेक्टर जमिनीवर नवीन वसाहत निर्माण केलेली आहे. त्यामुळे औरंगाबादचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली असून नाशिक व नांदेड जिल्ह्य़ातही दोन छोटय़ा नगरी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. नागपूर येथे राज्य शासनाच्या आदेशाने एक ५० हेक्टर जमिनीवर गृहनिर्माण वसाहत उभी करण्यात आली आहे. चिखलधारासारखे हिल स्टेशन विकसित करण्याची जबाबदारी राज्य शासनाने मोठय़ा विश्वासाने सिडकोवर यापूर्वीच दिलेली आहे तर जालना, लातूर यांसारख्या दुष्काळी भागात नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोने काम पाहिले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील दुसरे सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या वसई विरार पालिकेचा शहर विकास आराखडा सिडकोने तयार केलेला आहे. रायगड जिल्ह्य़ातील खोपटा भागातील सात गावांचा विकास आराखडा सिडकोने तयार केला असून मुंबई-गोवा मार्गावरील हा भाग विकसित करणे अद्याप बाकी आहे. याशिवाय छत्तीसगड राज्य निर्मितीनंतर तेथील राजधानी निर्मिती सिडको नियोजन सल्लागार म्हणून काम करीत असून या ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या सुनियोजित दहा शहरांचा विकास सिडकोच्या देखरेखेखाली होत आहे. याशिवाय शासनाने तीन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्य़ातील नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्राचा विकास आराखडा सिडको तयार करीत असून या ठिकाणी छोटी छोटी संकल्पना शहरे तयार केली जाणार आहेत. या शहर निर्मितीच्या रांगेत आता पालघरसारख्या नवीन जिल्ह्य़ातील शासकीय जमीन व मुख्यालय निर्मिती सिडको करणार आहे.