नवी मुंबई : पारंपरिक इंधनात झालेली दरवाढ व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले धोरण पाहता आता विद्युत वाहनांकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत २७८ वाहनांची नोंद नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयात झाली आहे. यात १५० बस असून ५८ कार व ७० दुचाकींचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात यात आणखी वाढ झाली असून ही संख्या तीनशेपेक्षा अधिक झाली आहे. आगामी काळात यात वाढ होईल असे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पारंपरिक इंधनाचा तुटवडा व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विद्युत वाहनांबाबत धोरण जाहीर केले असून त्याला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर नुकतेच महाराष्ट्र शासनानेही आपले विद्युत वाहनांबाबत धोरण जाहीर केले आहे. यात अनेक सबसिडीच्या माध्यमातून अनेक सवलती देण्यात येत असून पायाभूत सुविधांवरही भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत (बॅटरीवर चालणारी) वाहने खरेदीचा विचार करीत असून कल वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या नवी मुंबईत तुर्भे येथे एक मोठे चार्जिंग केंद्र झाले असून नवी मुंबई महापालिका लवकरच शहरात चार्जिंगचे जाळे उभारणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहन चार्जिंगचा प्रश्नही सुटणार आहे. तसेच ही वाहने घरीही चार्जिंग करता येत आहेत. जानेवारी ते जुलै या कालावधीत नवी मुंबई २७८ वाहनांची नोंद उपप्रादेशिक कार्यालयात झाली आहे. पुढील काळात यात मोठी वाढ होईल, अशी शक्यता आहे.