पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली वसाहतीमधील नागरिक दरवर्षी पावसाळा जवळ आला की भीतीच्या सावटाखाली जीवन जगतात. २००५ साली आलेल्या पहिल्या भीषण पुरानंतर आजपर्यंत प्रशासनाने केलेल्या सर्व उपाययोजना फोल ठरत आहेत. धारणतलावातील गाळ काढल्याशिवाय तरणोपाय नसल्याचा सल्ला आयआयटी मुंबईच्या अभ्यासगटाने पालिकेला दीड वर्षांपूर्वी दिला होता. पनवेल महापालिकेने शहरात साचणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सल्लागार नेमून उपाययोजनांचा अहवाल सादर केला. हा अहवाल पालिकेने तपासणी व निरीक्षणासाठी आयआयटी, मुंबई या संस्थेकडे पाठविला होता. आयआयटी संस्थेच्या अभ्यासगटाने या अहवालाची तपासणी करून पालिकेला दीड वर्षांपूर्वी सुधारित अहवाल दिला. कळंबोलीतील धारणतलावातील गाळ काढल्याशिवाय वसाहतीला दरवर्षी भेडसावणाऱ्या पूरसदृश स्थितीवर कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही असे या अभ्यासगटाने सुचविले असून त्यासोबत अजूनही विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.
या अहवालाच्या आधारे पालिकेने गाळ काढण्यासाठी २१ कोटी रुपये आणि मोटारपंप यंत्रणेसाठी ७५ कोटी रुपये असे सुमारे ९६ कोटी रुपयांच्या कामांची निविदा जाहीर केली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे या निविदेला प्रतिसाद मिळू शकला नाही. तांत्रिक अडचणी दूर करून ८ मे रोजी पुनर्निविदा जाहीर केली आहे.
आयआयटीच्या अभ्यासगटाच्या सूचना –
-धारणतलावातील गाळ तातडीने आणि नियमितपणे काढणे.
– वाढीव क्षमतेचे मोटार पंपिंग स्टेशन उभारणे.
– तलावात जल प्रवेशद्वारांवर झडपा बसवून भरतीचे पाणी शहरात शिरण्यास अटकाव करणे.
– तलाव व नाल्यांची वार्षिक देखभाल सक्तीची करणे.
– मोठ्या नाल्यांना शक्य असल्यास उघड्या स्वरूपात ठेवून देखभाल सुलभ करणे.
– स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा व टाइड गेजेस बसवून पूराची लवकर सूचना देणारी प्रणाली उभारणे.
– नागरिकांना सतर्क करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे.
पनवेल महापालिकेने कळंबोली सेक्टर ७ येथील धारणतलावामधील गाळ काढण्यासाठीची निविदा जाहीर केली आहे. तसेच संबंधित काम करण्यासाठी कांदळवन विभाग, सीआरझेड आणि एमसीआरझेड या विभागांच्या परवानगीची प्रक्रियाही सुरू केली आहे. पूर सदृशस्थितीत नागरिकांसाठी पालिकेने आपत्ती नियंत्रण अधिकारी व मनुष्यबळ नेमले आहे.- संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महापालिका