नवी मुंबई : “रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. ट्रिपल इंजिनने अशा महागाईत वीज वाढ केली. सामान्य लोकांच्या समस्या दूरच पण सध्या धमक्या, कारवाई असे सुरू असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केले. रविवारी बारामती सातारा आणि ठाणे जिल्हा मतदार संघाची प्रचार सभा नवी मुंबईतील कोपर खैरानेत पार पडली. त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जे शिवसेनेचे झाले तेच आमचे झाले. पक्ष पळवला, चिन्ह चोरले. ऐन निवडणुकीत काँग्रेसचे बँक खाते सील केले. हे सुडाचे राजकारण आहे. यापूर्वी अनेक मतभेद होते मात्र सुडाचे राजकारण नव्हते असे सांगत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाचे उदाहरण सुप्रिया सुळे यांनी दिले. 

आणखी वाचा-उरण : निवडणूक आणि आचारसंहिता काळात निसर्ग नष्ट करण्याचा प्रयत्न

त्या पुढे म्हणाल्या, अशोक चव्हाण यांचा माझ्याविषयी गैरसमज झाला मात्र निर्मला सीतारामण यांनी सर्व आदर्श ऐकले पण आदर्श घोटाळा ऐकला नाही असे म्हटल्यावर मी त्याला सर्वाधिक विरोध केला. असाच आरोप केजरीवाल यांच्यावर केला गेला पण केजरीवाल यांनी भाजप प्रवेश केला नाही म्हणून ते तुरुंगात आणि भाजपमध्ये गेले म्हणून अशोक चव्हाण बाहेर कसे. आयआयटी मुंबईमधील ३५ टक्के लोकांना रोजगार मिळाला नाही. धनगरांना आरक्षण देऊ भाजप म्हटले होते ते दिले नाही आणि तेच मराठ्यांचे झाले. तलाठ्यांच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याने भरती स्थगित झाली. या भागात माथाडी कामगारांचे योगदान मोठे आहे. माथाडी कामगारांच्या मुलांचे शिक्षण, त्यांचे घरे वा कुठलीही समस्या या पवार यांनी प्रयत्नपूर्वक समस्या सोडवल्या. जे काँग्रेसने उभे केले ते भाजपने विकले. असा दावाही सुळे यांनी केला. तसेच महाराष्ट्रात ४८ सीट असून चार फेस मध्ये मतदान आहे. यातच महाराष्ट्रात युतीची स्थिती दर्शीवते. माझ्या विरोधात सर्व पक्षीय पुरुष उभे राहिले आहेत. स्थानिक प्रश्न समस्या दूरच पण शरद पवार यांना संपवणे हे ध्येय भाजपचे आहे. असा आरोपही सुळे यांनी केला .

तर शशिकांत शिंदे म्हणाले, छत्रपतींचे नाव घेत राजकारण केले पण स्मारक उभे केले नाही. साताऱ्यात कोण लढणार आहे ते पहा अन्यथा पवार साहेबांनी आदेश दिला तर मी तयार आहे. असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. इस्रायलमध्ये हमास विरोधात राजकीय उद्देश्य ठेवल्याचा आरोप करीत लोकांनी आंदोलन केले, तर रशियात विरोधी पक्षाला संपवले हे भारतात व्हायला नको असेल तर शरद पवार यांना प्रतिसाद द्या. खासदार कसा असावा हे राजन विचारे यांनी दाखवले. सहा वेळा संसद रत्न पुरस्कार सर्व सांगून जातो त्यामुळे सुळे ताईंबाबत फारसे बोलणे योग्य नाही. गावातील निवडणूक मी नवी मुंबईतील आपल्या भागातील लोकांच्या सहकार्याने जिंकलो. तेच सुप्रिया सुळेंबाबत नक्की होणार याचा मला विश्वास आहे. आपल्याला मिळालेले चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हच जिंकून देणार. बाजार समिती नवी मुंबईत स्थलांतरित केले माथाडी कामगारांना घरे पवारांनी दिली. हे विसरू नका. आज माथाडी कामगारांना उद्धवस्त केले जात आहे नवे नियम आणून हे केले जात आहे.

आणखी वाचा-रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही

बहिणीची नक्कल करणारा पहिला भाऊ महाराष्ट्राने पहिला आहे. अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच सुनील तटकरे बाबत बोलताना ते म्हणाले की तटकरे स्वतः खासदार, दोन्ही मुले आमदार, मुलगी मंत्री, सकाळी सोबत आणि दुपारी गद्दारी हे योग्य नाही. तसेच नवी मुंबईतील गणेश नाईक यांनाही आमदार खासदार स्थायी समिती सभापती महापौर एकाच घरात दिली. एवढं देऊनही बाहेर गेले. शरद पवार यांच्या मांडीचे ऑपरेशन झाले त्याच वेळी दादा बाहेर गेले. याबाबत मी स्वतः सूचित केले मात्र शरद पवार यांनी नाईक यांच्यावर विश्वास दाखवला. नाईक यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत हे यांचे दात घशात घालायची वेळ आहे. असे सांगत निरोप घेत निघून गेले. 

पक्ष पाळणारे चिन्ह चोरणाऱ्यांना माफ करू नका. उद्योग गुजरातला नेणाऱ्यांना विसरू नका. सातारा भोर भागातील मतदार ठोकशाही विरोधात सुळे यांना निवडून देतील असा विश्वास आहे. असे थोडक्यात आपले मत व्यक्त करत राजन विचारे यांनी भाषण आटोपते घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे , माजी मंत्री जितेंद्र आव्हाड  यांच्या सह पुणे, भोर, सातारा सांगली परिसरातील स्थानिक पदाधिकारी आणि नवी मुंबई शिवसेना (उबाठा), जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, शरद पवार गटाचे एन सी पी अध्यक्ष चंद्रकांत पाटील आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.