लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : रायगडमधील शेतकऱ्यांवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नसल्याचे मत रायगडचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. रविवारी उरणच्या जेएनपीटी सभागृहात महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिडकोच्या नैना,एमएमआरडीए आणि इतर प्रकल्पाकरीता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत केल्या जात आहेत. या संपादनाला येथील शेतकऱ्यांनाचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्वाचा असल्याने याची दखल लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घेण्यात आली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना(शिंदे) गटाच्या श्रीरंग बारणे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ही बारणे यांची तिसरी वेळ आहे. मागील दोन निवडणूकिती मोठया फरकाने ते विजयी झाले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजितपवार), आरपीआय या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत फेसबुक वरून संवाद साधणारे असा उल्लेख केला. तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट केले. मेळाव्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर,महेश बालदी व उमेदवार श्रीरंग बारणे यांची भाषणे झाली. त्यांनी विजयाचा दावा केला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा-नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

दिबांच्या नावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमीवर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. महायुतीच्या मेळाव्यात दिबांचे जिरंजीव अतुल पाटील यांनी राज्य सरकारबे दिल्लीत पाठविलेल्या राज्य सरकारच्या नावाच्या ठरावाला मान्यता देण्याची मागणी केली.