नवी मुंबई : गेल्या वर्षी अखेरच्या दिवसांत मालमत्ता करवसुलीसाठी ढोल वाजवण्यासह इतर कायदेशीर कारवाई करावी लागल्याने मालमत्ता कर विभागाने आतापासूनच करवसुलीचे नियोजन करीत प्रथम थकबाकीदारांकडून वसुली करावी; प्रसंगी कठोर कारवाई करावी, असे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
नवी मुंबई महापालिकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षांत करापोटी ६०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष ठेवले होते. मालमत्ता कर विभागाने वर्षांअखेरीस ५६३ कोटींची वसुली केली. अखेरच्या ४ दिवसांत सुमारे ९२ कोटींची वसुली करण्यात आली. त्यामुळे आता सुरुवातीपासूनच करवसुलीचे नियोजन करण्यात येणार आहे.
नवीन आर्थिक महापालिका प्रशासनाने ८०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष ठेवले आहे. अखेरच्या टप्प्यात थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या ठिकाणी जाऊन ढोल वाजवून वसुली करावी लागते. तसेच अनेक ठिकाणी अटकावणी करणे, नोटीस बजावणे, खाती सील करणे अशी कठोर पावले उचलावी लागतात. त्यामुळे पहिल्या महिन्यापासूनच वसुलीसाठी हे विविध उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांना मालमत्ता विभागाला दिले आहेत.
थकबाकीदारांसाठी वारंवार अभय योजना जाहीर करण्यात आलेली होती; परंतु तरीदेखील अनकांनी थकबाकी भरली नाही. सवलतीचा लाभ घेण्यासही फारशी उत्सुकता दिसून येत नव्हती.
या अनुषंगाने मोठय़ा रकमेची थकबाकी असलेल्या व विशेष अभय योजनेचा लाभ घेण्यात स्वारस्य न दाखविणाऱ्या थकबाकीदारांवर नव्या आर्थिक वर्षांत थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमावलीनुसार मालमत्ता जप्तीची, बँक खाती गोठविण्याची तसेच नळजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरुवातीपासूनच करण्याचे निर्देश दिले आहेत. मालमत्ता कर तसेच इतर कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातूनच पालिका नवी मुंबई शहरातील विकासकामे करते. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेतच कर भरणा करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षांत ६०० कोटी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले होते; परंतु मागील आर्थिक वर्षांत ५६२ कोटी वसुली झाली आहे. पुढील आर्थिक वर्षांत मात्र ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य निश्चित केले असून ते १०० टक्के करण्यासाठी अखेरच्या महिन्यात ढोलताशे वाजवून वसुली करण्यापेक्षा आतापासूनच थकबाकी वसुलीचे निर्देश देण्यात आले आहेत. – अभिजित बांगर, आयुक्त