व्हिडिओ व्हायरल… फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी परिसरात गुरुवारी झालेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान काही फेरीवाल्यांनी सुरक्षारक्षक तसेच नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना घडल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान केलेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संबंधित फेरीवाल्यांविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई एपीएमसी ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे दररोज हजारो शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची वर्दळ असते. मात्र भाजीपाला, फळ, धान्य आणि मसाला बाजारांच्या प्रवेशद्वारांवर अनधिकृत फेरीवाल्यांची वाढती गर्दी, रस्त्यांच्या कडेला केलेले अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त वाहनतळ यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पदपथांवरही फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागत असून नागरिकांच्या अपघाताचा धोकाही वाढला आहे.

फेरीवाल्यांनी एपीएमसी परिसरातील रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण केल्यामुळे रस्त्यांच्या कडेला साचणारा कचरा नाल्यांत अडकतो. त्यामुळे एपीएमसीतील फळ आणि भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारावर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना वारंवार घडतात. एकीकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने बाजार घटक नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही व्यापाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे फेरीवाले जागा सोडण्यास टाळाटाळ करतात आणि कारवाई दरम्यान रस्त्यावरून माल उचलून बाजारात आश्रय घेतात.

कारवाई पथकांची पाठ फिरली की पुन्हा येऊन त्याच ठिकाणी पुन्हा विक्री सुरू करतात. याला एपीएमसी प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि फेरीवाले व अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांसोबतचे संगनमत जबाबदार असल्याची चर्चा बाजारात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर प्रशासनाचा धाक उरला नसल्याची भावना बाजार घटकांनी व्यक्त केली आहे.

तुर्भेचे विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणविरोधी पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असली तरी उपलब्ध मनुष्यबळ आणि फेरीवाल्यांना बाजारातून मिळत असलेला आश्रयामुळे कारवाईला मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

परंतु, मारहाणीचा घटनेमुळे फेरीवाले आणि प्रशासन यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाला असून कारवाई पथकाच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान, गुरुवारी अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू असताना काही फेरीवाल्यांनी अचानक सुरक्षारक्षक व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, फेरीवाल्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पदपथ व रस्त्यांवर अनधिकृतरीत्या बसलेल्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे विभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.