घाऊक बाजारात भाव गडगडले, पण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाज्यांची आवक वारेमाप झाल्याने गुरुवारी तुर्भे घाऊक बाजारात भाज्यांचा दर निम्म्याने घसरला, पण तरीही किरकोळ विक्रीत भाज्यांचे चढे दर कायम राहिल्याने सामान्यांसाठी भाजी महागच आहे.

अवकाळी पावसाने नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी त्यांचा शेतमाल लवकरात लवकर बाजारात पाठविण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यात शेजारील राज्यांतूनही मोठय़ा प्रमाणात शेतमाल येत आहे. तुर्भे बाजारात रोज भाज्यांचे सरासरी ५५० ते ६०० ट्रक येतात. गुरुवारी तब्बल ६५० ते ७०० ट्रकभरून भाजी आली. त्यामुळे बाजारातले दर निम्म्याने खाली आले. तरीही किरकोळ बाजारात सामान्यांना या दरघसरणीचा लाभ मिळाला नाही.

थेट पणन योजनेमुळे आता ठिकठिकाणी भाजीविक्री होते. त्यामुळे घाऊक बाजारात भाजीला फारसा उठाव नाही. परिणामी तेथे भाज्यांचे दर निम्म्याने घसरले. कोबीसारखी सर्वसामान्यांना परवडणारी भाजी तीन रुपये किलो दराने विकली गेली. तसेच दोन दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये दर असणाऱ्या वाटाणा गुरुवारी थेट ३८ ते ४० रुपये इतका खाली आला. मात्र घाऊक बाजारात फारसा उठाव नसल्याने नाशवंत भाज्या अक्षरश: उकिरडय़ावर फेकाव्या लागण्याची भीती आहे.

१० वर्षांतला नीचांक आवक वाढल्याने

भाज्यांचे दर इतके गडगडले की या दरघसरणीने गेल्या १० वर्षांतला नीचांक नोंदविला आहे. मात्र या स्वस्ताईचा लाभ थेट ग्राहकांना होऊ शकला नाही.

अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकरी लवकर भाज्या आणत आहेत. परराज्यांतूनही आवक वाढली आहे. थेट पणन योजनेमुळे घाऊक बाजाराकडे खरेदीदारांची पाठ आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त होऊनही उठाव नाही. त्यामुळे या स्वस्ताईचा फायदा ग्राहकांना झाल्याचे दिसून येत नाही.

– कैलाश तांजणे, अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक भाजीपाला महासंघ

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable is expensive for the common man
First published on: 23-11-2018 at 03:15 IST