नवी मुंबई : शहरात करोनाचे २०४९ मृत्यू झाले आहेत.करोनाच्या तिन्ही लाटेत करोना मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी दोन ते चार इतके होते. मात्र तिसरी लाट ओसरल्यानंतर आता मृत्यूंचे हे सत्र थांबले आहे. गेल्या ५० दिवसांत शहरात करोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.
करोनाची तिसरी लाट झपाटय़ाने वाढली व तितक्याच वेगाने ओसरली असून दैनंदिन करोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. डिसेंबर २४ पासून सुरू झालेली तिसरी लाट तितक्याच वेगाने ओसरल्यामुळे दिलासा मिळाला आहे. एकंदरीतच करोनाच्या कार्यकाळात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू ६० वर्षांवरील नागरिकांचेच झाले आहेत.
नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी सापडला तर पहिला मृत्यू १५ मार्च २०२० रोजी झाला. तेव्हापासून दोन र्वो करोनाचे शहरात थैमान सुरू होते. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
० ते १० वयोगटातील फक्त एका मुलाचा करोनामुळे मृत्यू झाला तर सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहेत.तिसऱ्या लाटेत कमी कालावधीत मोठय़ा प्रमाणात रुग्ण वाढल्याने पुन्हा शहरातील करोना केंद्रे सुरू करण्यात आली व महिनाभरातच वाशी वगळता इतर केंद्रे बंद करण्यात आली. शहरात १ लाख ५१ हजारांच्या पुढे करोनामुळे बाधितांची संख्या झाली असून २०४९ इतके मृत्यू झाले. आता गेले ५० दिवस शहरात एकही करोना मृत्यू झालेला नाही.
नवी मुंबई शहरात मागील दोन वर्षांत दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर आली. करोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात असून मागील जवळजवळ ५० दिवसांत एकाही नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला नाही, ही समाधानकारक बाब आहे. पालिका प्रशासनाचे प्रयत्न व नागरिकांचे सहकार्य यामुळेच करोनावर मात करण्यात पालिकेला यश प्राप्त झाले आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका