डॉ. श्रुती पानसे प्रत्येक घरात काही ना काही समस्या असू शकतात. लहान मुलांना आपले आईबाबा, आपलं घर, शिक्षक हे सगळे जण अतिशय आनंदात, मजेत असावीत असं वाटतं. पण असं काही प्रत्येक वेळेला शक्य नसतं. काही गोष्टी खूप चांगल्या असतात. तर काही गोष्टींमध्ये लहान- सहान प्रश्न असतात. घरातली लहान किंवा वाढत्या वयातली मुलं घरातले प्रश्न आपले आईबाबा आणि घरातले लोक कसे हाताळतात, कसे सोडवतात हे बघत असतात. घरात नेहमीच आनंदाची परिस्थिती असत नाही. कित्येकदा आपल्यावर किंवा आपल्या जवळच्या माणसांवर वाईट परिस्थिती ओढवते. अगदी कल्पनाही करू शकत नाही; इतकी वाईट. उदाहरणार्थ, कोणाचा मृत्यू, कर्ज, जवळच्या माणसाने केलेली फसवणूक, घराचं अपयश, टोकाची भांडणं, आर्थिक दृष्टय़ा कमकुवत असल्याचा सल, मुलं अभ्यासात मागे असणं असे किंवा इतर प्रश्न असू शकतात. या प्रश्नांमुळे घरातल्या माणसांना वाईट वाटतं, ताण येतो. अशावेळी घरातला आनंद वगैरे गोष्टी फार लांब जातात. पण तरीही अशा अवस्थेतही स्वत:शी आणि एकमेकांशी बरं, सामान्य वागता येतंय का हे बघायला हवं! इतर माणसं दु:खात असतात तेव्हा त्यांना धीर दिला तर त्या सकारात्मक शब्दांनी वातावरण हलकं व्हायला मदत होते. काही तरी चुकीचं होऊन बसलंय हे खरं, पण लवकरच सर्व काही नीट होईल अशी आशा जाणवून जाते. आपण इतरांशी कसं वागत असतो हे मुलं बघत असतात, त्यातूनच शिकत असतात, जोपर्यंत बुद्धी स्थिर होत नाही, तोपर्यंत उपाय सुचणार नाहीत. प्रत्येक प्रश्नाला उपाय असतातच. आपल्या आसपासच असतात. पण स्थिर मनाला ते पटकन सापडतील. आईबाबांच्या आणि इतरांच्या चेहऱ्यावरचे संतुलित भाव पाहून मुलांना आधार वाटतो, सुरक्षितता वाटते. कटकट, भांडणं, आरडाओरडा यामुळे कॉर्टसिॉलसारखी ताणकारक आणि राग वाढवणारी रसायनं निर्माण होतात. यापेक्षा स्थिर आणि संतुलित चेहरे आणि वागणं यामुळे प्रश्न सुटण्याची शक्यता वाढते. सकारात्मकता वाढते. यातून विश्वास निर्माण होतो. ऑक्सिटोसिन निर्माण होतं. एकमेकांशी समपातळीवरचं नातं तयार होतं. जेव्हा हे प्रश्न सुटतील तेव्हा ते प्रश्न आता सुटले आहेत, हेही मुलांपर्यंत जायला हवं. contact@shrutipanse.com