जहाज समुद्रातून प्रवास करीत असताना त्याचा वेग मोजणे हे एक किचकट काम आहे. पूर्वी वेगवेगळ्या पद्धती वापरून जहाजाचा वेग मोजला जात असे. या सगळ्या पद्धतींमुळे जहाजाचा पाण्यातला वेग कमीअधिक अचूकतेने मोजता येतो. हा वेग काही वेळा उपयोगी पडत असला तरी नाविकाला खरी गरज असते ती जहाजाच्या जमिनीवरच्या वेगाची. याचा अर्थ असा की, पाण्याबरोबर फक्त वाहात जाणाऱ्यास जहाजाचा पाण्यातला वेग शून्य असला तरी जमिनीचा संदर्भ घेता तेच जहाज प्रवाहाइतक्या वेगाने प्रवास करीत असते. हा वेग मोजण्यात चूक झाली तर जहाज खडकावर किंवा उथळ पाण्यात जाऊन अडकण्याचा अपघात होऊ शकतो. रेडारचा वापर करून असा वेग काढता येत असे, पण त्यासाठी जवळपास एखादा भूस्थिर संदर्भ (ग्राउण्ड रेफरन्स) असावा लागतो. गेल्या सुमारे तीन दशकांपासून जहाजांवर 'डॉपलर लॉग' नावाचे उपकरण बसवण्यात येते. नावात सूचित केल्याप्रमाणे हे ‘डॉपलर इफेक्ट'वर चालते. यातून प्रसारित केल्या जाणाऱ्या श्रवणातीत ध्वनिलहरी समुद्रतळावरून परावíतत होऊन परत येतात तेव्हा प्रक्षेपित लहरी आणि परावíतत लहरींच्या वारंवारितेत होणारा फरक मोजून जहाजाचा वेग अचूकपणे सांगता येतो. बहुतेक डॉपलर लॉग्ज जहाजाचा पुढे किंवा मागे जाण्याचा वेग दाखवतात. हा वेग सामान्यत 'नॉट्स' या एककात दाखवला जातो. मोठय़ा जहाजांना आडव्या अक्षातील वेगावरही नियंत्रण ठेवावे लागते आणि सामन्यत मीटर्स/सेकंद या एककात मोजला जातो. डॉपलर लॉगचे ध्वनिप्रक्षेपक जहाजाच्या तळाशी कोन करून बसविलेले असतात. यातून प्रक्षेपित केलेल्या ध्वनिलहरी समुद्राच्या तळावर आदळून परावíतत होतात. या परावíतत लहरी डॉपलर लॉग ग्रहण करतो. जेव्हा जहाज सुमारे ३० मीटर्सपेक्षा अधिक खोलीत जाते तेव्हा या लहरी तळाला पोहोचेपर्यंत अतिशय क्षीण होतात आणि त्या वारंवारितेच्या मोजमापासाठी निरुपयोगी होतात. अशा वेळी पाण्याच्याच थरावरून (डीप स्कॅटिरग लेयर) परावíतत झालेल्या लहरींचा वापर करून वेगाचे मोजमाप केले जाते. - सुनील सुळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org अली सरदार जाफ़री : दीर्घकाव्य १९४८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘नई दुनिया को सलाम’चा मराठी अनुवाद- ‘नव्या जगाला प्रणाम’- श्रीपाद जोशी यांनी केला आहे. सरदार जाफरी यांचे हे सर्वात मोठे नावीन्यपूर्ण असे रूपकात्मक दीर्घकाव्य आहे. यातील जावेद आणि मरियम (पती-पत्नी) ही स्वातंत्र्यलढय़ाची, संघर्षांची प्रतीके आहेत. फिरंगी हे अत्याचाराचे जुलमाचे प्रतीक आहे. जासूद हा पारंपरिक निरोप्या आहे. अजून जन्मास न आलेले बालक भावी पिढीचे प्रतिनिधित्व करते. अजून ते आकार धारण करीत आहे. ते नव्या जगाचे प्रतीक आहे. त्याचा सुंदर व निरागस आत्मा संपूर्ण काव्याला व्यापून राहिला आहे. विषयाचा विचार करता या काव्याला ‘साम्यवादाचे संग्राम गीत’ म्हणायला हरकत नसावी. उपोद्घात या प्रकरणात हिंदुस्थानातील दु:ख, दारिद्रय़ व दास्य यांचा कालखंड म्हणजे एक भीषण काळोखी रात्र किंवा भयंकर राक्षसीण आहे. हा काळोखाचा पडदा फाडून टाकण्यासाठी क्रांतीची जरुरी आहे, पण या क्रांतीचे उद्दिष्ट केवळ माथेफिरूपणाने करावयाचा विध्वंस नसून, नवी समाजरचना घडवून आणणे हे आहे. सरदार जाफरी लिहितात- ‘काळय़ा रंगाचे झेंडे वाऱ्यावर फडफडत आहेत काळोखी रात्र डोके वर काढून उभी आहे काळा न्याय तुरे खोवून बसला आहे काळी रात्र.. प्रकाशापासून तोंड लपवून फिरत आहे.. क्रांतीच्या प्रभातीचा तो उजेड कोठे आहे? मानवाच्या अंतरात्म्याचा तो सूर्य कोठे आहे?’ जावेद फिरंगीला म्हणतो, ‘आम्हाला आमचे दास्य मान्य नाही या देशातील एका कणावरही तुझा अधिकार नाही..’ मरियम म्हणते, ‘अत्याचाऱ्यांच्या विरुद्ध बंड व क्रांती ही मानवतेकडे जाण्याची शिडी आहे..’ त्यावर फिरंगी त्यांना पकडायला येऊन आरोप करतो, ‘तुम्ही- जावेद व मरियम तुम्ही लोकशाहीशी संगनमत करून क्रांतीची व बंडाची आग भडकविली..’ त्यावर जावेद विचारतो, ‘आपल्या बापजाद्यांच्या या भूमीवर.. जन्मभूमीवर आम्हाला सुखाने श्वासोच्छ्वास करण्याचाही अधिकार नाही?..’ मानव- नवनिर्मिती करणारा मानव. आज इंग्रजी राज्यात घर असून बेघर बनला आहे आणि म्हणून नव्या काफिल्यामध्ये सामील होण्याचे आवाहन करीत ‘उपसंहार’मध्ये कवी म्हणतो, ‘देशासाठी लढणाऱ्या हे योद्धय़ांनो, पुढे पुढे चालत राहा..’ - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com