खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सूर्याचे वस्तुमान किती असावे याचा अंदाज केलेला आहे. हे वस्तुमान २ ७ १०३३ ग्राम एवढे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. गंमत म्हणजे संपूर्ण विश्वाचा विचार केला तर सूर्य हा एक अगदी सामान्य तारा असून त्याच्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेले अब्जावधी तारे या विश्वात आहेत. आता सहजपणे मनात येणारा विचार म्हणजे, इतक्या दूर असलेल्या या ताऱ्यांच्या वस्तुमानाचा अंदाज कसा केला जातो? त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्यातील दोन पद्धती आपण पाहू या. शास्त्रज्ञांनी अनेक ताऱ्यांचा अभ्यास करून त्यांची दीप्ती (Luminosity) आणि तापमान यांची माहिती मिळविलेली आहे. (दीप्ती याचा अर्थ एका सेकंदात त्या ताऱ्याने बाहेर टाकलेली ऊर्जा). या माहितीच्या आधारे त्यांनी एक आलेखवजा आकृती तयार केली आहे. हा आलेख काढताना त्यांनी ताऱ्याचे वस्तुमान, त्याची दीप्ती आणि तापमान यांच्याशी जोडले आहे आणि ताऱ्यांच्या वस्तुमानानुसार त्यांची वर्गवारी केली आहे. ही आकृती खगोलशास्त्रातील एक प्रसिद्ध आकृती असून तिला Hertzsprung-Russel diagram असे नाव दिलेले आहे. एखाद्या नवीन ताऱ्याचे वस्तुमान ठरविण्यासाठी या आकृतीची मदत घेतली जाते. प्रथम त्या ताऱ्याची दीप्ती आणि तापमान ठरविले जाते. मग तो तारा या आकृतीत योग्य त्या ठिकाणी ‘बसविला’ जातो. आकृतीतील त्याच्या स्थानावरून त्याचे वस्तुमान निश्चित केले जाते. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो आणि जेव्हा माध्यम बदलते तेव्हाच त्याचा मार्ग वक्र होतो, असे आपण शाळेत शिकतो. अल्बर्ट आइनस्टाईनने सापेक्षता सिद्धांत मांडताना आणखी एक शक्यता वर्तविली होती. प्रकाश जेव्हा एखाद्या खूप मोठय़ा वस्तूजवळून प्रवास करतो, तेव्हासुद्धा त्याचा मार्ग सूक्ष्म प्रमाणात वक्र होतो. हा मार्ग किती प्रमाणात वक्र होईल, ते त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असेल असेही त्याने सूचित केले होते. या पद्धतीचा वापर करून अगदी अलीकडे म्हणजे २०१७ सालच्या जुलै महिन्यात एका ताऱ्याचे वस्तुमान ठरवण्यात आले आहे. - डॉ. गिरीश पिंपळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org विंदा करंदीकर - ‘अष्टदर्शने’ विंदा करंदीकर हे मराठीतील एक प्रयोगशील कवी म्हणून ओळखले जातात. करंदीकरांनी सुनीत रचना, तालचित्रे, गझल, सूक्त या प्राचीन काव्यप्रकारातही वेगळेपणा आणले. सुक्तामध्ये शाश्वत सत्याची मांडणी करण्याचा प्रयत्न असतो, पण विंदांची सूक्ते आधुनिक जीवनातील अंतर्विरोधाचा, अनिश्चिततेचा आविष्कार करतात. मराठीमध्ये सुनीत रचनेसाठी शार्दूल विक्रीडित हे वृत्त वापरले जाते- हे बंधन विंदानी नाकारले, तसेच सुनीतामधील यमक योजनेचे आणि काही वेळा सुनीताच्या १४ ओळींचे बंधनही नाकारले.या प्रयोगशीलतेने मराठी कवितेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ‘स्वेदगंगा’ (१९४९) ते विरुपिका (१९८१)-हे विंदाचे पाच काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यानंतर आता काही लिहायचे नाही. प्रसिद्ध करायचे नाही असे त्यांनी ठरविले, पण २००३ मध्ये त्यांचा आगळावेगळा ‘अष्टप्रदर्शने संग्रह’७ प्रकाशित झाला! ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या वेळी त्यांच्या एकूणच साहित्यनिर्मितीचा आणि ‘अष्टदर्शने’चा विचार केला गेला. मराठी वाचकांना देकार्त, स्पिनोझा, काष्ट, हेगेल, तित्शे, शोपेन हौएर, बर्गसा- या सात पाश्चात्त्य आणि चार्वाक या भारतीय तत्त्वज्ञांची, तत्त्वचिंतकाची- त्यांच्या विचारांची ओळख करून देणे- या हेतूने त्यांनी ‘अष्टदर्शने’ ही काव्यरचना ‘अभंग’ या रचना प्रकारात केली आहे. विंदानी अर्वाचीन, पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाला काव्यात्मक रूप देऊन ते मराठी वाचकांसमोर आणले आहे. ‘प्रत्यक्ष’ हे प्रमाण मानणारे आणि ईश्वर, आत्मा, मोक्ष परलोक इ. प्रत्यय प्रमाणाच्या कक्षेत न येणाऱ्या सर्व अतीद्रिंय गोष्टी ठामपणे नाकारणारे हे चार्वाकचे बुद्धीवादी दर्शन यात आहे. चार्वाक ( इ. स. ७ वे शतक) हे पूर्णत: अनुभववादी .- ‘चार्वाक दर्शन’मध्ये विंदा लिहितात- ‘चार्वाक मानतो। प्रत्यक्ष हेच प्रमाण शब्द व अनुमान। अव्हेरून धर्मग्रंथातील। शाब्दिक विधान ज्ञानाचे साधन। नसे होत-’ ‘देकार्त दर्शन’ (१५८६- १६५०)- ते लिहितात- ‘देकार्त नव्हता। निव्वळ तत्त्वज्ञ तो होता गणितज्ज्ञ। वैज्ञानिक..नव्या विज्ञानाचा। प्रभाव प्रखर त्याच्या दृष्टीवर। दिसे स्पष्ट..’ या ‘अष्टदर्शनां’त अत्यंत साध्या, सोप्या शब्दात हे तत्त्वज्ञान विंदानी मांडले आहे. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com