डॉ. श्रुती पानसे

वाढत्या वयातल्या मुलांना झेलणं हे दिवसेंदिवस अवघड का होत चाललं आहे? आईबाबा आणि शाळा – दोघांसाठीही हे अवघड होतं आहे. मुलांची प्रत्येक नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा चार पावलं पुढे असते. जास्त स्मार्ट असते, असं म्हटलं जातं.

मुलं टीन एजमध्ये येतात तेव्हा नाठाळपणा वाढतो. त्यांच्याच भाषेत बोलायचं तर ‘आयडीसी ऊर्फ आय डोन्ट केअर’ वृत्ती वाढून बेफिकिरी वाढते. आपलंच म्हणणं खरं करण्याची वृत्ती वाढते. त्यांच्या मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे अव्यवस्थितपणा वाढतो. याचा परिणाम निर्णयक्षमतेवर होतो. परंतु यापलीकडे जाऊन मुलं जेव्हा असंस्कारित पद्धतीचं वर्तन करतात, रस्त्यावरच्या भांडणातल्या शिव्या घरात येतात, मुलांच्या आणि मुलींच्याही दफ्तरात सिगरेटची पाकिटं दिसतात, तेव्हा यावर मार्ग काढायचा कसा, हा प्रश्न भंडावून सोडतो. वास्तविक आजच्या मुलांना त्यांच्या आईबाबांनी पूर्वीच्या हुकूमशहा पद्धतीने वाढवलेलं नाही. बऱ्याच अंशी मुलांच्या कलाने वाढवलं आहे. त्यांच्यावर प्रेम करत, कल लक्षात घेत आणि त्यांचं म्हणणं ऐकत, त्यांना घरात बरोबरीचं स्थान देत, आधुनिक पद्धतीनं वाढवलं आहे. यासाठी  कित्येकदा दोन्हीकडच्या आजी-आजोबांशी वादही घातलेला आहे. खर्च तर भरपूरच केलेला आहे.

पण तरीही, मुलांच्या या वयाच्या वळणावर काहीसा बदल होतो. या आधीच्या काळात सहज-शांत असलेलं घर अचानक अशांत आणि धुमसतं होतं. यात अनेकदा मुलांचा आवाज वरचढ असतो आणि आईबाबांनी स्वत:च्या म्हणण्यानुसार गोष्टी रेटायचा प्रयत्न केला तर वातावरण जास्त तापतं. १०० टक्के चुकत असली तरी मुलं अधिकारवाणीने आणि आपल्याला सर्व काही समजतं या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं मांडत असतात आणि आईबाबा नक्की काय बरोबर, या पेचात असतात.

अशा वेळी टीन एजमधल्या मुलांच्या मेंदूतला ट्रॅफिक जाम लक्षात घेण्याची गरज असते. विविध रसायनांच्या उद्रेकामुळे आधीच ते गोंधळात असतात. मुलं गोंधळात असतात, आपण नसतो. एवढं लक्षात ठेवलं तरी अर्धी लढाई जिंकल्यासारखी असते. आपल्याला त्यांच्याशी वादविवादात जिंकायचं नाहीये तर दूरगामी वळण लावायचं आहे.

contact@shrutipanse.com