मध्ययुगीन काळातील हिंदुस्थानातील सुरुवातीच्या हिंदी आणि फारसी विद्वान कवी आणि शायर तसेच संगीतकारांमध्ये अमीर खुसरो यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. फारसी, अरबी, हिंदी, अवधी आणि संस्कृत अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या अमीर खुसरोंनी फारसी आणि हिंदी भाषांमध्ये उत्तमोत्तम काव्यरचना केल्या. शायर म्हणून अमीर यांची प्रतिमा अत्यंत आदरणीय आहे. त्यांनी रचलेल्या पाच लाख शेरांव्यतिरिक्त जनसामान्यांच्या तोंडी असलेल्या पहेलियाँ आणि मुकरियाँही भरपूर उपलब्ध आहेत. त्यांच्या रचना फारसी आणि हिंदी भाषेत आहेत. त्यांच्या जीवनकाळात हिंदुस्थानात उर्दू ही भाषा विशेष प्रचलित नव्हती. खुसरो यांनी एकूण ९२ ग्रंथ लिहिले. त्याचा ‘खलिफा-ए-बारी’ हा हिंदीतला काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तसेच त्यांनी ११ मसनवी (खंडकाव्यं) लिहिल्या आहेत. वर्णमालेतील प्रत्येक मुळाक्षराचं यमक घेऊन लिहिलेली किमान प्रत्येकी एक गझल असली तर त्या संग्रहाला ‘दिवान’ म्हटलं जातं. साहजिकच त्यासाठी कवीचे असामान्य भाषा आणि शब्दप्रभुत्व, तसेच प्रतिभा असावी लागते. हजरत अमीर खुसरोंनी लिहिलेले असे पाच दिवान ही त्यांची मोठी कामगिरी आहे. हे पाच दिवान अमीरची ओळख आहे. ‘तुहफतु सिग्र’ (बालपणीची शुभेच्छा भेट), ‘वस्तुल हयात’ (जीवनाचा मध्यावधी), ‘गुर्र्तुल कमाल’ (शुक्ल पक्षातील प्रतिपदेची विलक्षण रात्र), ‘बकीयाह नकीयाह’ (उरले सुरले) आणि ‘निहायतुल कमाल’ (अंतिम सीमा) ही त्या पाच दिवानांची नावे आहेत. अमीर यांनी बकीयाह नकीयाह या चौथ्या दिवानमध्ये गजम्ल या काव्यप्रकाराची महती अशी गायली आहे, ‘चलता फिरता जादू जो लोगोंके सरपे चढम्कर बोलता है!’ प्रसिद्ध शायर मिर्झा असदुल्ला गालिबदेखील केवळ एकच दिवान रचू शकले यावरून अमीर खुसरोंच्या पांडित्याची थोरवी लक्षात येते. प्रसिद्ध सुफी संत मोईनोद्दीन चिस्ती यांचा मोठा प्रभाव असलेले अमीर खुसरो त्यांना आपले गुरू मानीत असत. सुनीत पोतनीस- sunitpotnis@rediffmail.com