अनादिकालापासून भारतीयांना खगोलशास्त्राविषयी असणारी माहिती अचंबित करणारी होती. त्या काळी ग्रह, तारे व ग्रहण यांच्या स्थितीवरुन अनेक घटनांचे कालमापन करता येत असे. पण ज्यांची खगोलीय माहिती नाही, अशा घडलेल्या घटनांची कालनिश्चिती कशी करायची? त्यासाठी आपल्या कामी येते ‘आधुनिक किरणोत्सर्गी कालमापन पद्धत’ (रेडिओ डेटिंग मेथड). मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीनुसार कार्बन-१२ हा तसा बलभीमच. त्याच्या रासायनिक क्रियांचा आवाका एवढा जबरदस्त की त्यासाठी कार्बनी रसायनशास्त्र हा अभ्यासक्रम महाविद्यालयात स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जातो. पण, कार्बन-१२ पासून तयार झालेला कार्बन-१४ सुद्धा काही कमी नाही. त्याचा उपयोग विश्वाची अचूक माहिती उलगडण्यात होत आहे. सजीवांची निर्मिती झाली, तेव्हा पृथ्वीवरच्या पृष्ठभागावरील परिस्थिती फारच वेगळी होती. सूर्याकडून येणारी अतिनील किरणे सरळ भूतलावर येत असत. या अतिनील प्रारणांना आकाशात होणाऱ्या विजांच्या कडकडाटांची साथ जेव्हा मिळे, तेव्हा उ-१२ चे रूपांतर उ-१४ या किरणोत्सारी समस्थानिकात होई. थोडक्यात, अतिनील किरणे आणि विद्युत स्फुल्लिंग या बाबी उ-१४ तयार होण्यासाठी मुख्य बाबी होत्या. हे वातावरण दीर्घकाळ अस्तित्वात होते. त्यामुळे सजीवांमध्ये त्याचा आपसूकच प्रवेश झाला. कार्बन-१४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावलेल्या विलार्ड फ्र ँक लिब्बी या अमेरिकन शास्त्रज्ञाला १९६० साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या मते हरित वनस्पतीसारखे सजीव जिवंत असताना हवेतील कार्बन डायऑक्साइड घेत असतात. या कार्बन डायआॉक्साइडच्या घटकांमध्ये कार्बन-१४ हा घटक असतो. तो किरणोत्सर्गी आहे. प्राणी जिवंत असताना या कार्बन-१४ ची किरणोत्सर्गाची क्रिया सतत सुरू असते. सर्व प्राण्यांमध्ये कार्बन-१४ चे प्रमाण एकच असते आणि मृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून ते एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या कार्बन-१४ चा अर्धा भाग ५७३० वर्षांनंतर नाहीसा होतो. या कालावधीला कार्बन-१४ चे अर्धे आयुष्य म्हणतात. अशाच प्रकारे नंतरच्या ११,१३६ वर्षांनी त्याच्याही निम्मा कार्बन-१४ शिल्लक राहतो आणि सुमारे ७०,००० वर्षांनी त्याची किरणोत्सर्गाची क्रिया पूर्णपणे थांबते. आधुनिक काळातील कार्बन-१४ च्या किरणोत्सर्गाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्गाशी तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला, हे ठरविता येते. अलीकडच्या उत्खननातून निघालेल्या वस्तूंचे काळ या पद्धतीने ठरविण्यात आले आहेत. उदा. सौराष्ट्रातील लोथल या सिंधू संस्कृतीच्या प्रसिद्ध शहराचा काळ ४०३० म्हणजे इ.स.पूर्व २१८० हा याच पद्धतीने ठरविण्यात आला. - दिलीप वंडलकर मराठी विज्ञान परिषद ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org