सर्वसाधारणपणे जमिनीचा कस, पाणीपुरवठा, हवामान आणि मिळणारे उत्पन्न या प्रमुख निकषांवर शेतजमिनीचे वर्गीकरण करण्यात येते.
१) बागायती जमीन : या जमिनीतून वर्षभर सर्व प्रकारची पिके, फळबागा, भाजीपाला व इतर नित्योपयोगी शेतीसंलग्न उत्पादने मिळू शकतात. पाऊस, विहिरी, नद्या अथवा कालवे यांसारख्या जलसाधनांच्या मदतीने अशा जमिनीवर बारमाही लागवड होऊ शकते. त्यामुळे अशा जमिनीस पाण्याखालची अथवा ओलिताखालील जमीन म्हणूनही संबोधले जाते.
२) जिरायती जमीन: जलसिंचनाची साधने अथवा पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने अशा जमिनी लागवडीखाली फक्त नसíगक पावसाच्या पाण्यावर म्हणजेच पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, गहू, डाळवर्गीय कडधान्ये अशा वार्षकि पिकांसाठीच त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे या जमिनी कोरडवाहू जमिनी म्हणून ओळखल्या जातात.
३) पडीक जमीन: सामान्यत: ज्या खडकाळ, मुरमाड, माळरान जमिनीवर कसलेही लाभदायी पीक निघू शकत नाही, अशा जमिनी यात मोडतात. महसुली दस्तात अशा जमिनींचा माळरान, पोटखराबा, पडीक जमिनी असा उल्लेख करतात.
शेतजमिनी वेगवेगळ्या हक्काने किंवा सत्ता प्रकाराने धारण करता येतात. बहुसंख्य जमिनी स्वतंत्र मालकी हक्काच्या अथवा सरकारी अधिकाराच्या असल्याने त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत केले जाते.
स्वतंत्र मालकी हक्काच्या जमिनी : वंशपरंपरेने अथवा वारसा हक्काने धारण केलेल्या खासगी मालकी हक्काच्या सर्व प्रकारच्या जमिनी या वर्गात मोडतात. अशा भूधारकाला कब्जेदार अथवा भूस्वामी म्हणून संबोधले जाते. त्याचप्रमाणे याचा उल्लेख सातबाराच्या उताऱ्यामध्ये स्पष्टपणे केलेला असतो. असा भूस्वामी स्वत: अथवा इतरांच्या मदतीने जमीन कसू शकतो. अशा जमिनीचा भूधारक त्या मिळकतीचा चिरकाल मालक असतो. कुणाच्याही परवानगीशिवाय त्याला स्वत:च्या जमिनीची विक्री करण्याचा संपूर्ण अधिकार असतो.
– भरत कुलकर्णी (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. – संगीत
मी गणितात जसा ‘ढ’ आहे तसाच संगीताच्या बाबतीत अनभिज्ञ आहे. अगदी औरंगजेब नाही, परंतु ज्याप्रमाणे सर्वसाधारण जनतेला संगीतातले राग ओळखता येत नाहीत त्यातलाच मीही. आरोह-अवरोह, श्रुति, खर्ज वगैरे शब्द मला व्यर्ज आहेत. परंतु चांगले गाणे मला लगेच कळते आणि भावते किंबहुना एकदाच ऐकून हे गाणे लोकप्रिय होण्याची शक्यता मी वर्तवू शकतो. मला एकाने विचारले, कोठल्या हिंदी सिनेमातले संगीत तुला सर्वात जास्त आवडले? माझे उत्तर आहे अनारकली. सी. रामचंद्र (चितळकर) यांचे संगीत होते. एखाद्या चित्रपटात सगळीच गाणी एकाहून एक सरस असल्याचे आणि सहज सुलभतेने कानाला आणि मनाला सुख देणारी असावीत त्याचे ते उत्तम आणि विरळा उदाहरण.
हल्लीच ‘लोकसत्ते’त श्रुती सडोलीकरने संगीताला मनाचा उद्गार म्हटले आहे. श्रोत्यांच्या बाबतीत ते मनाला भिडणारे ध्वनी ठरतात. हृदयनाथ मंगेशकर काय म्हणत आहेत ते मला कळते. त्यांचा आणि लतादीदींचा मोगरा माझे मन फुलवतो. माझे एक ज्येष्ठ मित्र आहेत, डोंबिवलीचे केतकर. त्यांनी ओंकारसाधनेमुळे गायकी आणि गाण्याची अनुभूती सुधारते, असे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले आहे. त्यात त्यांना ‘पीएच.डी.’ मिळाली. देश-परदेशात तो सिद्धांत मान्यताप्राप्त झाला, याचे मला आश्चर्य वाटत नाही. विश्वाची नाळ त्याच्या ध्वनीत आहे. आणि विश्वात निर्माण होणारा प्रत्येक ध्वनी त्या नाळेशी सुसंगत असतो. हे मला स्वयंसिद्ध वाटते. धडाधड कोसळणाऱ्या लाटा, ओहोटीची गूढ साद आणि भरतीच्या सुरुवातीची गाज माझ्या अगदी प्राथमिक अवस्थेतल्या संगीत मनाला खुणावतात. माणसाने ध्वनीच्या लहरींना निरनिराळ्या कंपनांच्या श्रुतींमध्ये बांधले आहे. परंतु त्याचे स्वरूप जिन्यासारखे आहे. डोंगराभोवती वळसा घालत वर-खाली जाणाऱ्या पायवाटेसारखे नाही, हे प्लेटोने म्हणून ठेवले होते. ते माझा एके काळचा विद्यार्थी नंतर मित्र आणि आता आदरस्थानी असलेल्या विद्याधर ओक यानेही ओळखले आणि त्यातून संशोधन करून एक वाद्य तयार केले आहे, त्यातला मतलब मला लगेच भिडतो. याउपर एकच म्हणणे आहे. मोठय़ाने वाजवलेल्या संगीताचा सोस जल्लोष आणि त्यातून कृत्रिम हल्ली तयार केला जातो तसा उन्माद ‘पब्लिक’ने एवढय़ा मोठय़ांदा जगाला दाखवणे आणि ऐकवणे हा अन्याय आहे. अहो पब्लिकचे सोडा, आमच्या सहनिवासात दोन मोठय़ा गोड, सुस्वभावी सुना आल्या आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन हल्ली झालेल्या आमच्या होळीच्या कार्यक्रमात प्रचंड प्रमाणात संगीत वाजवले गेले. त्यांना मी म्हणणार आहे रस्त्यावरून कर्कश आवाज करीत गणपतीच्या मिरवणुका जातात. त्यांना तुम्ही २ ूँींस्र् म्हणता आणि आपणही तेच केले! पुढच्या वर्षी काहीतरी निराळे करूया. उद्याचा विषय संस्कृत.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस-वंध्यत्व स्त्रीविचार : भाग – २
गर्भाशयाची अपुरी वाढ ही कमतरता कळायला काही वेळेस खूपखूप विलंब होतो. गर्भाशयाची अपुरी वाढ, असे निदान- कारण कळल्यानंतर संबंधित स्त्री-पुरुषांनी काही काळ ‘संबंध’ पूर्णपणे टाळावा. कारण अपुऱ्या वाढीचा गर्भाशय सुधारल्याशिवाय, राहिलेला गर्भ टिकत नाही. स्त्रीला नैराश्य येते.
आपल्या आयुर्वेदीय औषधी महासागरात समस्त संबंधित स्त्री समस्या, सोडविण्याकरिता तीन अनमोल औषधी वनस्पतीभगिनींची मदत यशस्वी ठरते. शतावरीच्या मुळ्यांना शतवीर्या, सहस्रवीर्या असे योग्य नामाभिधान आहे. ही वनस्पती शरीरातल्या सर्व तऱ्हेच्या आशयांवर, गर्भाशय, स्तन्याशय, आमाशय, पच्च्यमानाशय, पक्वाशय, हाता-पायांचे स्नायू याकरिता मोठेच योगदान देत असते. आस्कंद ही वनस्पती बीजधारणा टिकावू व्हावी म्हणून हुकमी मदत देते. ज्येष्ठमधाच्या वापराने गर्भाशयातील फाजील उष्णता कमी होते. शतावरी, आस्कंद प्र. १५ ग्रॅम व ज्येष्ठमध ५ ग्रॅम, दोन कप पाणी आटवून अर्धा कप काढा करून नियमितपणे तीन महिने घेतल्यास बहुधा गर्भाशयाची पुरेशी वाढ होते. त्याचे जोडीला चंद्रप्रभा, शृंगभस्म, सुवर्णमाक्षिकादिवटी, पुष्टीवटी व रात्रौ आस्कंदचूर्ण अशी औषधयोजना किमान तीन महिने घ्यावी.
काही अनपत्या स्त्रियांची मासिक पाळी अल्प, अनियमित अशी असते. त्यांनी नियमितपणे सकाळ- सायंकाळ एकएक खारीक व जेवणानंतर पाव चमचा बाळंतशोपा चावून खाव्यात. वनस्पती तूप, शिळे अन्न, जागरण कटाक्षाने टाळावे. पाळी नियमित येण्याकरिता कन्यालोहादी, कठपुतळी, कृमीनाशक, गोक्षुरादी, त्रिफळागुग्गुळ, चंद्रप्रभा प्र. ३ दोन वेळा सकाळ-सायंकाळ व जेवणानंतर आर्तवक्वाथ व कुमारीआसव नियमितपणे तीन महिने घ्यावे. पांडुता असल्यास सुवर्णमाक्षिकादिवटी, शृंगभस्म घ्यावे. स्त्री कृश असल्यास शतावरीघृत, अश्वगंधापाक यांची मदत घ्यावी. काही महिलांना तंबाखू, मशेरीची सवय असते. अशी सवय सोडावी हे सांगावयास नकोच.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २३ ऑक्टोबर
१९२३> ‘श्रीविद्या प्रकाशन’चे संस्थापक-संचालक दामोदर दिनकर तथा ‘मधुकाका’ कुलकर्णी यांचा जन्म. १९६८ साली स्थापलेल्या प्रकाशन संस्थेमार्फत हयातभर (२००० पर्यंत) त्यांनी सुमारे एक हजार पुस्तके प्रकाशित केली. परदेशांत मराठी पुस्तकांच्या प्रकाशन सोहळय़ांचे इव्हेन्ट त्यांनीच सुरू केले. य. दि. फडके , रा. चिं. ढेरे आदी अभ्यासकांची पुस्तके मिळवण्यातही ते यशस्वी झाले. ‘प्रकाशकनामा’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे.
१९३८> विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखक, अनुवादक अशोक विठ्ठल पाध्ये यांचा जन्म. त्यांनी लिहिलेल्या ‘डीएनएचे गोलगोल जिने’ या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय काही अनुवादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
२००५> सुमारे १०० मराठी ग्रामीण आणि तमाशापटांचे पटकथाकार तसेच कथाकार, चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचे निधन. पाच नाटके, तीन कथासंग्रह आणि व्यक्तिचित्रांचे तीन संग्रह या त्यांच्या पुस्तकांपेक्षा ‘पाटलाचं पोर’ हे आत्मचरित्र अधिक गाजले. या आत्मचरित्रातून मराठी चित्रपटांच्या चार दशकांचे अंतरंग उलगडते, अशी दाद मिळाली होती.
– संजय वझरेकर