जागतिकीकरणानंतर आपल्या देशात काही विदेशी कंपन्या आल्या. भारत आणि चीन हे दोन देश जगातील मोठय़ा बाजारपेठा आहेत. या विदेशी कंपन्यांनी भारतात प्रवेश केला आणि शेतमालावर व फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग प्रस्थापित केले. मक्याच्या लाह्य़ा, बटाटे वेफर्स, ज्यूस, केचप, सॉस यांचे उत्पादन सुरू केले. या कंपन्या हाच माल आपल्या देशात विकून प्रचंड फायदा मिळवीत आहेत.
आपल्या देशात फळे आणि भाजीपाल्याच्या फक्त दोन टक्के मालावर प्रक्रिया केली जाते. इतर देशात ८० ते ९० टक्के मालावर प्रक्रिया केली जाते. आपण आपल्या देशातील शेतमाल उदा. द्राक्षे, आंबे, भाज्या आणि औषधी वनस्पती जशीच्या तशी कच्चा शेतमाल म्हणून निर्यात केली तर मालाचा भाव कमी मिळतो. पण आंब्याऐवजी आमरस, द्राक्षापासून बेदाणे, वाइन, दुधापासून दूध पावडर, लसणीऐवजी लसूण पावडर असे पदार्थ करून त्यांचा टिकाऊपणा वाढवला तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो.
शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण भागात युवकांना पुष्कळ संधी आहेत. स्वयंरोजगार करण्याची अत्यंत चांगली संधी आहे. या क्षेत्राचे महत्त्व ओळखून भारत सरकारने अन्न प्रक्रिया मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याच्या बऱ्याच योजना आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान रोजगार हमी योजनेतून जिल्हा शेती अधिकारी काजूप्रक्रिया व इतर उद्योगांना मदत करतात. युवकांनी व फळभाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राची, शेतकी अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपले उद्योग प्रस्थापित करावेत.
२००५ या वर्षी शेती मंत्रालयाच्या पुढाकाराने ‘व्हेन्चर कॅपिटल फॉर एग्रोबिझिनेस प्रोजेक्ट्स’ ही योजना जाहीर झाली. या योजनेतून छोटय़ा शेतकऱ्यांना तसेच शेती उद्योगांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. ही योजना भारत सरकारच्या सर्व बँकांमधून राबविली जाते. ग्रामीण भागातील महिला गटांनी मोठय़ा प्रमाणात या क्षेत्रात शिरण्याची गरज आहे. कारण खाद्य पदार्थ व फळ प्रक्रिया क्षेत्रात त्या सहज भाग घेऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..   – ती सहृदय संपादक
माझ्यावर चालवलेल्या हलगर्जीपणाच्या खटल्यात माझ्याविरुद्ध निर्णय झाल्यावर किंवा त्याच्या आधी धादांत खोटी माहिती असलेली एक बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या तिसऱ्या पानावर चार कॉलमी मथळा देऊन छापण्यात आली. त्या बातमीच्या खाली बातमी देणाऱ्या बाईचे नाव छापले होते. माझ्या डोक्यात सणक चढली आणि मी त्या वर्तमानपत्राला फोन केला. कोणी धड उत्तर देईना.
मग मी गनिमीकावा केला. त्या स्त्री वार्ताहराची माहिती मिळवली. मग एका बऱ्यापैकी वरच्या स्तरावरच्या उपसंपादकाची ओळख काढली आणि काहीतरी इतर कामासाठी भेटायचे आहे म्हणून त्याची वेळ घेतली. माझी झाडाझडती घेऊन मला आत सोडण्यात आले. त्या माणसाशी मी गप्पा मारू लागलो, मग माझ्या बातमीच्या अनुषंगाने विचारू लागलो. मग आरडाओरडा करू लागलो. एखाद दुसरी लहान वस्तू इकडे फेकत ‘‘आताच्या आता मला संपादकाशी भेट करून द्या’’ अशा गर्जना करू लागलो. हे सगळे नाटक होते. सगळे लोक आवाक झाले. सुरक्षारक्षक आले, मला धरू लागले तेव्हा मी त्यांच्याशी मारामारी सुरू केली, तेव्हा एका केबिनमधून एखादी राणी शोभावी अशी एक बाई बाहेर आली आणि म्हणाली मीच संपादक आहे, जरा आत या.
मग मी तिच्याशी अर्धा तास बोललो. ती जे म्हणाली ते ऐकून मी थक्कच झालो. ती म्हणाली, ‘‘ही बातमी छापताना मलाही ती बातमी योग्य वाटली नव्हती. त्या बातमीसाठी तुमच्याशी संपर्क झाला नव्हता हे पत्रकारितेच्या नीतीप्रमाणे नव्हते, पण ती बातमी छापली गेली हे अयोग्यच होते.’’ मी तिला म्हटले, ‘‘ही तुमची वार्ताहर स्त्रीवादी आणि घटस्फोटित आहे, पण म्हणून तुम्ही मला बकरा करू नका. तिला माझ्यासमोर उभी करा आणि हिने जर घटस्फोट घेतला आहे तर ही नवऱ्याचे नाव का लावते?’’ त्या वेळी ही राणीसारखी दिसणारी संपादक म्हणाली. ‘‘असल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मी बांधील नाही.’’ पण जर तुम्ही मला रीतसर पत्र दिलेत तर ते मी आमच्या वार्ताहरांच्या बैठकीत ठेवीन आणि जर सगळ्यांनी हो म्हटले तर त्याबद्दल काय आणि कसा मजकूर छापायचा हे ठरवता येईल.
मी तिचे आभार मानले आणि घरी जाऊन पत्र लिहिले आणि मला वाटते फॅक्स केले. चार दिवसांनी दिलगिरीच्या चार छोटय़ाशा ओळी छापून आल्या. मूळ बातमीच्या पाच टक्केही नसतील पण आल्या. पण हे भांडण मी पुढे चालू ठेवणार होतो आणि त्याला कारण घडले माझ्या मेव्हण्याच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल छापलेल्या एका विपर्यस्त बातमीमुळे त्याबद्दल उद्या. हे प्रकरण सुरू झाले कुठे आणि गेले कुठे, हे मागे वळून बघतो तेव्हा मलाच माझे हसू येते.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commodities process
First published on: 12-06-2013 at 12:03 IST