नायलॉन हे नाव एकरेषीय पॉलीआमईड बहुवारिकापासून बनविल्या जाणाऱ्या सर्व तंतू कुटुंबासाठी दिले जाते. नायलॉन तंतूसाठी पॉलीआमईड बहुवारिक बनविण्याच्या सामान्यत: दोन पद्धती आहेत.
पहिल्या पद्धतीत दोन्ही टोकांना आम्ल समूह (-COOH) असलेल्या संयुगाची रासायनिक प्रक्रिया दोन्ही टोकांना अमाइन (-NH) असलेल्या संयुगाबरोबर केली जाते व यापासून अमाइड हे संयुग तयार होते. या अमाइडचे बहुवारिकीकरण करून पॉलीअमाइड हे बहुवारिक बनविले जाते. व या पॉलीअमाइड बहुवारिकपासून नायलॉन तंतू बनविला जातो. या प्रक्रियेद्वारे तयार होणाऱ्या नायलॉन तंतूला नाव देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. बहुवारिक तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या संयुगातील दोन आम्ल समूह आणि दोन अमाईन समूह यांमध्ये समाविष्ट असलेल्या कार्बन अणूंच्या संख्येवरून हे नाव दिले जाते. उदा. हेक्सॅमिथिलीन डायअमाईन व अॅडिपिक आम्ल यापासून बनविलेल्या नायलॉन तंतूस नायलॉन ६, ६ असे नाव दिले गेले.
दुसऱ्या पद्धतीमध्ये असे एकच संयुग निवडले जाते की ज्याच्या एका टोकास आम्ल समूह -COOH) आणि दुसऱ्या टोकास अमाईन समूह (-NH) असतो. अशा संयुगांना सर्वसामान्यपणे ‘कॅप्रोलॅक्टम’ असे नाव आहे. या संयुगाचे बहुवारिकीकरण करून त्यापासून नायलॉन तंतू बनविला जातो. उदा. (NH-[CH2]n-COOH) संयुगाचे बहुवारिकीकरण केले असता -NH- [CH2]n-CO-) x या रासायनिक सूत्राचे बहुवारिक तयार होते. या सूत्रातील मुख्य भागातील कार्बन अणूंची संख्या (n) आणि आम्ल रेणुतील कार्बनची संख्या (१) या दोन्ही कार्बन अणूंची संख्या मिळून होणाऱ्या कार्बन अणूंच्या संख्येवरून नायलॉनला नाव दिले जाते. जर n ही संख्या ५ असेल तर त्या नायलॉनला ‘नायलॉन ६’ असे संबोधले जाते.
या दोन्ही पद्धतींमध्ये बहुवारिक बनविण्याच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये फरक असला तरी बहुवारिक तयार झाल्यावर तंतू बनविण्याच्या पुढील प्रक्रिया मात्र समान असतात.
नायलॉनच्या बहुवारिकापासून ‘वितळ कताई’ पद्धतीने तंतू बनविले जातात.
संस्थानांची बखर: गुलछबू जगतजीतसिंग
कपुरथाळ्याचे शेवटचे अधिकृत महाराजा जगतजीतसिंग यांनी एकूण सहा विवाह केले. पहिले चार विवाह भारतीय राजघराण्यांमधील स्त्रियांशी, तर पाचवा पॅरिस येथे अनिता देलगॅडो या स्पॅनिश युवतीशी झाला. विवाहानंतरचे तिचे नाव प्रेमकौर. सहावा विवाह कपुरथाळा येथे युजेलिया मारिया ग्रोसुपोवा या चेक (झेक) उमराव कन्येशी झाला.तारादेवी हे विवाहानंतरचे नाव असलेल्या या राणीने १९४६ साली कुतुबमिनार वरून उडी टाकून आत्महत्या केली. उंची कपडे आणि मद्यपान यांचेही महाराजा शौकीन. त्यांचे वरचेवर फ्रान्समध्ये जाणे येणे असल्याने व फ्रेंच भाषा उत्तम येत असल्यामुळे महाराजांना अनेक फ्रेंच मत्रिणी होत्या. कानमधील एका उंची वस्त्रदुकानात कामास असलेल्या युवतीच्या रूपावर भाळलेल्या महाराजांनी तिच्याशी संधान जुळवून देण्याची कामगिरी आपल्या दिवाणावर टाकली. दिवाणाने त्याप्रमाणे केल्यावर महाराजांनी त्या युवतीला आपल्याबरोबर आपल्या राज्यात येऊन पाहुणचार स्विकारण्याचा आग्रह केला व तो तिने त्वरित स्वीकारला. महाराजांनी आपल्याबरोबर तिला कपुरथाळ्यास आणून तिची व्यवस्था आपल्या एका महालात केली. तेथील तिच्या वर्षभराच्या मुक्कामात महाराजांचा तिच्याशी लग्न करण्याचा इरादा होता परंतु तिला तसे स्वत न सांगता त्यांनी आपल्या दिवाणावर ती कामगिरी सोपविली. परंतु आपला एक अमेरिकन प्रियकर असून पुढच्याच महिन्यात त्याच्याशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक होणार असल्याचे तिने सांगितले. महाराजांनी तिला त्वरित पॅरिसला परत धाडले.
जगजीतसिंग यांचे थोरले पुत्र युवराज परमजीतसिंगला पत्नी वृंदापासून तीन मुली होत्या. ‘वारस नाही’ म्हणून तो काळजीत होता. त्याची इंग्लिश मत्रिण स्टेला त्याच्याबरोबर राहात होती आणि तिच्याशी विवाह करून पुत्ररत्न मिळवावे असा युवराजाचा विचार होता परंतु लॉर्ड कर्झनने एक कायदा केला होता की एखाद्या भारतीय संस्थानिकाने विदेशी स्त्रीशी विवाह केल्यास झालेल्या संततीस त्याच्या मालमत्तेचा वारसा हक्क मिळणार नाही. अखेर वृंदास पुत्ररत्न झाले, त्यामुळे समस्या नैसर्गिकरीत्या सुटली!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com