वाडा:  अंबाडी-दिघाशी या रस्त्यालगत असलेल्या एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शासकीय औषधांचा साठा अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही औषधे शासनाच्या आरोग्य विभागातून देण्यात येणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडच्या (लोहयुक्त) गोळय़ा आहेत. अंबाडी गावातील नाझिब धुरू हा तरुण सकाळीच चालण्यासाठी (मॉर्निग वॉक) दिघाशी रस्त्याला जात असताना एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात या गोळय़ांची पूर्ण भरलेली शेकडो पाकिटे अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आली.  त्यांनी ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

दरम्यान या गोळय़ांची मुदत (एक्सपायरी डेट) निघून गेलेली आहे. जुना साठा असल्याने या औषधांची विल्हेवाट लावण्यात आली असावी असे बोलले जात आहे. या गोळय़ा हिंदूस्थान लॅबोरेटरी पालघर या ठिकाणी तयार होऊन शासनाकडे आल्यानंतर त्या संबंधित आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी ठिकाणी वितरित केल्या जातात. यापैकी शासनाच्या कुठल्या तरी आरोग्य केंद्रातून या गोळय़ा टाकण्यात आल्या असाव्यात असे सांगितले जाते.

आरोग्य विभागांना उशिरा पुरवठा

आरोग्य विभागाच्या विविध अभियानांतर्गत आदिवासी व ग्रामीण भागात या गोळय़ांचे मोफत वाटप केले जाते. अनेक महिने या गोळय़ांचा तुटवडा भासत असतो. मात्र या गोळय़ांची मुदत  संपण्याच्या काही दिवस आधी आरोग्य केंद्रात त्याचा पुरवठा केला जातो. यामुळे या गोळय़ांचा साठा शिल्लक रहातो. मुदत संपलेल्या गोळय़ा रुग्णांना देणे घातक असल्याने अशा गोळय़ाची अशा प्रकारे विल्हेवाट लावली जात असल्याचे एका सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा विषय गंभीर असून शासनाने वेळीच लक्ष घालून वेळोवेळीच (मुदतीपूर्वी) औषधांचा साठा आरोग्य केंद्रांना पुरवठा करावा. 

-प्रमोद पवार, सामाजिक कार्यकर्ता, अंबाडी, ता. भिवंडी