लोकसत्ता प्रतिनिधी पालघर : बोईसर जवळील कुडण येथे दोन वयोवृद्ध भावांची हत्या करण्यामागे नेमके काय कारण होते याचा तपास पोलीस करणार असून अशा घटनांची पुनरावृत्ती तसेच जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या मनोरुग्ण यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील सर्व मनोरुग्णांची माहिती संकलित करून त्यांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात येईल अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली २९ फेब्रुवारी रोजी कुडण येथे दुहेरी हत्या केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या आरोपीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा शोध घेत असल्याचे समजल्यानंतर खाजण क्षेत्रात पाण्यात लपून बसणाऱ्या या हत्याराच्या पोटामधून किमान अडीच लिटर पाणी व गाळ काढण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर पालघर येथील विशेष न्यायालयात आज दाखल केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. आणखी वाचा-शहरबात: बंदरांचा परिसर शिवाजीनगर (सालवड) येथे राहणारा हा आरोपी एका रासायनिक कारखान्यात कामाला होता. घरच्यांशी वाद झाल्याने तो घरातून बाहेर निघून कुडण येथील एका चिकूच्या झाडाखाली वास्तव्य करत होता. त्याच्या या अधिवासा संदर्भात भीमराव पाटील यांनी हटकल्यामुळे त्यांची प्रथम हत्या केल्याची व नंतर भीमराव पाटील यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे जेष्ठ बंधू मुकुंद येत असताना समान पद्धतीने कुदळीने हल्ला करून निर्दयीपणे हत्या केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. आपल्या परिसरामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा वावर आढळल्यास त्याची वर्दी जवळच्या पोलीस स्टेशनला देण्याचे संकेत असून याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी सर्व बीट अंमलदार व पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वावरणारे मनोरुग्ण यांची माहिती संकलित करून त्याचा आगामी काळात आढावा घेण्यात येईल असे सांगितले. आरोग्य विभागाकडून त्यांची तपासणी करून घेऊन आवश्यकता भासणाऱ्या मनोरुग्णांना समाज कल्याण विभागाच्या मदतीने त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न केले जातील असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच घडलेली घटना ही व्यक्ती सापेक्ष स्वरूपाची असून नागरिकांनी अफवा पसरवू नये व या घटनेचे पर्यावसन अनोळखी व्यक्तींवर हल्ल्यांमध्ये होऊ नये यासाठी पोलीस दल दक्ष राहील याची ग्वाही दिली. या हत्या प्रकरणाचा तपास बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक करत असल्याचे सांगण्यात आले. आणखी वाचा-बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू उमरोळी पॅटर्न राबवण्यासाठी जिल्हा परिषदेला पाचरण करणार पालघर तालुक्यातील उमरोळी येथे फेरीवाल्यांना गावात फिरण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेऊन ओळखपत्र बाळगणे बंधनकारक केले आहे. चोरी, हत्या व इतर गैरप्रकार टाळण्यासाठी अशाच पद्धतीची अंमलबजावणी जिल्ह्यात सर्वत्र व्हावी यासाठी पोलीस जिल्हा परिषद प्रशासना सोबत चर्चा करून अशीच पद्धती सर्वत्र अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकारांना सांगितले. सर्व दिशेने तपास अवघ्या दोन दिवसात घराबाहेर पडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीकडून भयानकपणे हल्ला होण्यामागील सर्व शक्यतांची पडताळणी करून तपासणी करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या व्यक्तीने यापूर्वी मानसिक आजारा संदर्भात औषधोपचार घेतल्या बाबतची माहिती देखील आगामी काळात संकलित करण्यात येईल असेही सांगण्यात आले.