बोईसर: तीन दिवसीय केळवे बीच पर्यटन महोत्सवाला शुक्रवार पासून सुरवात झाली असून उद्या २६ नोव्हेंबर पर्यंत चालणार्‍या हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी जलक्रीडा यांना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून कोळी, वाडवळ, आगरी पद्धतीने बनविलेल्या वैविध्यपूर्ण आणि पारंपारीक खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी स्थानिक महिलांच्या स्टॉल्सवर खवैय्यें गर्दी करत आहेत.
काल (शुक्रवारी) या महोत्सवाचे उद्घाटन खासदार राजेंद्र गावीत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कोकण भूमी प्रतिष्ठान चे संयोजक संजय यादवराव, सरपंच संदीप किणी आणि केळवे बीच पर्यटन विकास संघाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. स्वच्छ आणि सुंदर असा लांबलचक किनारा, जवळच असलेले शीतलादेवीचे मंदीर, केळवे भुईकोट, गोवा आणि कोकणाप्रमाणेच नारळी पोफळीच्या बागा, हिरवागार परीसर यामुळे वर्षभर पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते. केळवे-माहीम परीसराची जास्तीत जास्त लोकांना माहीती होऊन पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दरवर्षी केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केळवे येथील पर्यटनाचा प्रसार व त्याचबरोबर परिसरातील विविध जाती धर्मातील परंपरा व खाद्यपदार्थाचा प्रचार व प्रसार करणे आणि त्यातून स्थानिकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

आणखी वाचा-पालघरजवळ बोट उलटून दोन कामगार बेपत्ता, २० जण सुखरूप; वैतरणा नदी पूल बांधकामाचे कामगार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महोत्सवात स्थानिक महीलानी विविध खाद्यपदार्थांसोबत विविध गृहपयोगी तयार वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. केळवे बीच महोत्सव म्हणजे हौशी खवय्यासाठी मोठी पर्वणी असून गावठी चिकन, मटण, पापलेट, सुरमई, कोलंबी, कोंबडी वडे, उकडहंडी अळूवडी, माशांचे कालवण, बोंबलांची पोतेडी आदी भिन्न विभिन्न पक्वाने या महोत्सवात खवय्यांना उपलब्ध करून देण्यात आली असून या स्टॉलना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शाकाहारी पदार्थाचे वेगळे स्टॉल ठेवण्यात आले असून महोत्सवात तीन दिवस विविध सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, समूह नृत्य, विविध स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.