पावसाळ्यात नंदारे गावातील नागरिकांचे हाल

डहाणू : कंक्राटी नंदारे ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रेल्वे कॉरिडॉरच्या माती भराव आणि खोदकामामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नंदारे गावात जवळपास १२० हून अधिक लोकसंख्या असून गावात जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. रेल्वे वहिनीसाठी माती भरावाचे काम कुर्मगतीने सुरू असून पावसाळ्यात चिखल पसरून तसेच रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

कैनाड तसेच नंदारे गावात जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यामधून रेल्वे कॉरिडॉर (मालवाहू रेल्वे मार्गिका) गेली असून माती भरावाचे तसेच रेल्वे बोगद्याचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. पावसामुळे नंदारे गावाकडे जाणारा मुख्य रस्ता चिखलमय झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना वाहनांना गावात जाण्यास मज्जाव झाला आहे. आजारी रुग्ण तसेच वयोवृद्धांना दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षाही जाऊ शकत नसल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले आहेत. याबाबत नागारिकांनी ठेकेदारास पर्यायी रस्ता देण्याची विनंती केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाशी संपर्क होऊ न शकल्याने प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

आम्ही वारंवार रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच ठेकेदारांना पावसाळ्यापुरता नंदारे गावाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र त्याला दाद मिळत नसल्याने नागरिकांना गावात जाण्यासाठी अत्यंत हालाला सामोरे जावे लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अविनाश चव्हाण, ग्रामस्थ, नंदारे