पालघर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान पालघर जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार घरांवर तिरंगा फडकवण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, साहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजीव जाधवर, जिल्हापुरवठा अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक संजय बोदाडे आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये प्रत्येक ग्रामस्थाच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांअंतर्गत असलेल्या घरांवर तिरंगा ध्वज लावण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखावर असेल. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय ठेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घरांवर तिरंगा ध्वज लावण्यासाठी नियोजन करून तो लागल्याची खात्री करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी बोडके यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या सर्व बसेसवर, तिरंगा ध्वजाचे स्टीकर लावण्यात यावे आरोग्य विभागाने सर्व रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, तसेच कर्मचारी वसाहतीवरती तिरंगा ध्वज लावावा. सर्व कार्यालय प्रमुखांनी रीतसर परवानगी घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात ड्रोनव्दारे चित्रीकरण करावे असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.