
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या आदेशानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली आहे.

राणा दाम्पत्याच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये धार्मिक उद्रेक घडवून राज्य उलथवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. यामागे भाजपा आहे आणि हे खूप मोठं षडयंत्र आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संघर्ष निर्माण करुन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करायची. मनाप्रमाणे घडले की राज्यपाल त्यांचेच आहेत. मग राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत, असेही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दोन्ही पक्षाचे प्रमुखे नेते आणि शरद पवार हे सगळे राज्य सक्षमपणे पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्येक कट हा उधळला जात आहे

हनुमान चालिसाला देशात कुठेच विरोध नाही. राणा दाम्पत्याने देवेंद्र फडणवीसांच्या घरात जाऊन हनुमान चालिसा वाचावी

नवनीत राणा या बोगस जात प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत. हा किती मोठा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भाजपाचे शिलेदार बनले आहेत.

भाजपा खासदार जय श्रीरामच्या घोषणेने शपथ घेत होते तेव्हा आक्षेप घेणाऱ्या नवनीत राणा होत्या. त्यामुळे यांनी आम्हाला शिकवू नये

तुम्हाला खाज होती तर तुम्ही वांद्रे स्टेशनवर हनुमान चालिसा वाचू शकता. मातोश्री एक पवित्र जागा आहे.

हनुमान मंदिरात न जाता तुम्हाला गोंधळ निर्माण करायचा आहे. हा गोंधळ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष सुरक्षा पुरवली आहे.

किरीट सोमय्यांवर हल्ला झाला नाही त्यांनी स्वतःला नखे मारुन घेतली आहेत.

आयएनएस घोटाळा केलेल्या व्यक्तीवर पारिजातकाची फुले फेकायची का? लोकांनी रागाने दगड मारला असेल, असेही संजय राऊत म्हणाले.