प्रबोध देशपांडे

अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अकोल्याच पालकत्व आल्याने जिल्ह्याच्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पालकमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न व रखडलेल्या विकास कामांमध्ये त्यांनी हात घातला. दर्जाहीन कामाचा पूर्वइतिहास लक्षात घेता गुणवत्तेत तडजोड चालणार नाही, अशी तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. भरीव निधीसाठी आश्वस्त करतांना जिल्ह्याच्या समतोल विकासावर भर राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून अकोला जिल्ह्यावरील पक्षाची पकड मजबूत करून ‘शत-प्रतिशत’ भाजप करण्याचे लक्ष्य राहणार आहे.

अकोला जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना असा एकूण ३१२ कोटी ६७ लक्ष ९८ हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या सर्व कामांवर लावण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आल्याने लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील कामांचे प्रस्ताव पाठवावे, अशा सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या. अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असतांना अकोलेकरांना खड्डेमय रस्त्यांवरून अवघड वाहतूक करावी लागत आहे. रस्त्यांचा मुद्दा बैठकीत प्रामुख्याने लोकप्रतिनिधींनी मांडला. त्यावर रस्त्याची दर्जेदार कामे करण्यास प्राधान्य देऊ, असे फडणवीस म्हणाले. काही वर्षांपूर्वी अकोला शहरात दर्जाहीन रस्ते तयार करण्यात आले. ‘सोशल ऑडिट’मध्ये रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कुठलीही कारवाई झाली नाही. हा मुद्दा समोर आल्यावर फडणवीसांनी कामातील गुणवत्तेत तडजोड नको, अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. रखडलेल्या सांस्कृतिक भवनासाठी निधी देण्यासह अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी भरती प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा आहे. एकमेव बाळापूर विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले. बच्चू कडू जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना शिवसेनेचे आमदार असल्याने बाळापूरला झुकते माप दिले होते. तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडूंचे भाजप आमदारांसोबतही सलोख्याचे संबंध राहिले. त्यांच्या मतदारसंघातही बच्चू कडूंनी भरपूर कामे मंजूर केली. त्यामुळे काही अपवाद वगळता बहुतांश कामे पुढेही सुरू राहतील. भाजपचा आता बाळापूर डोळा आहे. या मतदारसंघावर पुन्हा पक्षाचा झेंडा फडकवून ‘शत-प्रतिशत’ भाजप करण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बाळापूरचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार करीत असले तरी विकासात तफावत राहू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी समतोलता राखण्याचा मंत्र दिला. या माध्यमातून आगामी काळातील निवडणुकांची मोर्चेबांधणी केली जात असून जिल्ह्यावरील भाजपची वीण अधिक घट्ट करण्याचे प्रयत्न फडणवीसांकडून होत आहेत.

हेही वाचा… ‘धनुष्यबाण’ गोठल्याने परभणीत ‘खान पाहिजे की बाण’ या प्रचारालाही पूर्णविराम

अकोला महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. गेल्या पाच वर्षांत दोन उड्डाणपूल वगळता शहरात ठोस असे काम झालेले नाही. सत्ताधारी म्हणून निवडणुकीला समोरे जातांना भाजपला मतदारांच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागणार आहे. महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन शहर विकासासाठी अधिकाधिक निधी देण्याचे सूतोवाच देवेंद्र फडणवीसांनी केले.

शिवणी विमानतळाची उपेक्षाच

शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीची आवश्यकता आहे. ती अधिग्रहणासाठी निधीचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चार वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्या जमिनीची किंमत आता ८४ कोटीवरून १६६ कोटींवर गेली. तरी देखील शासन निधी देण्यास तयार नसून आश्वासनावर बोळवण केली जात आहे. विमानतळाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, माहिती घेऊन आवश्यक निधी देण्यात येईल, असे मोघम उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली. वास्तविक, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना २०१७ मध्ये विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत काहीच झालेले नाही.