मध्य प्रदेशातील नोव्हेंबर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २३० पैकी १६३ जागा जिंकत विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. तेव्हापासून राज्यात भाजपा एक प्रबळ पक्ष म्हणून उदयास येत आहे. पक्षाने केलेल्या दाव्यानुसार, हजारो काँग्रेस कार्यकर्ते भाजपात सामील झाले आहे. सध्या माजी राज्यमंत्री जितू पटवारी मध्य प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पटवारी यांनी काँग्रेस नेत्यांचे भाजपामध्ये जाणे, त्यांची रणनीती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या योजनांबद्दल सांगितले. त्यांनी भाजपावर अनेक आरोपही केले. ते नक्की काय म्हणाले? यावर एक नजर टाकू या.

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पटवारी यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पटवारी म्हणाले की, प्रत्येक गल्ली-बोळात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. पण त्या सर्वांशी समन्वय साधण्याची गरज आहे. पण आम्ही निवडणुकीत हरलो आणि आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे, हेही नाकारता येणार नाही.

भाजपाला मतदान करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणे

काँग्रेसच्या पराभवाचे एक कारण म्हणजे आदिवासींची मते भाजपाकडे वळणे. येत्या लोकसभा निवडणुकीतही याचा परिणाम दिसून येईल. या समस्येचा सामना कसा करणार, यावर पटवारी म्हणाले की, आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या मतदारांना समजले आहे की, भाजपा संविधान बदलण्यासाठी ४०० जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. हे मी म्हणत नसून स्वयंसेवक संघाने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार अनंत हेगडे यांनीही देशासमोर स्पष्टपणे हे सांगितले होते. आता लोकांच्या हे लक्षात आले आहे की, भाजपाला मतदान करणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणे.

हेही वाचा : घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आले. त्यावर पटवारी म्हणाले, संपूर्ण देशात आम्ही कार्यक्रम घेत आहोत आणि जनतेला समजवण्याचा प्रयत्न करत आहोत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा विरोधी पक्षांच्या नेत्यांची बँक खाती गोठवत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत, त्यांना तुरुंगात पाठवत आहेत. कारण, कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडणूक जिंकायची आहे. लोकशाही धोक्यात आहे. आमचे कार्यकर्ते, नेते, उमेदवार पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवतील.

मध्य प्रदेशात १६ हजारहून अधिक काँग्रेस नेते-कार्यकर्ते भाजपात?

मध्य प्रदेशातील १६ हजारहून अधिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पक्षात सामील झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. पटवारी म्हणाले की, देशभरात प्राप्तीकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि इतर एजन्सींनी १४१ नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यातील १२१ जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याचा अर्थ भाजपा विरोधकांना त्रास देण्यासाठी कोणत्याही मार्गाचा वापर करेल. भाजपा बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहे, असा आरोप पटवारी यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, जे घाबरतात किंवा जे लोभी आहेत, ते पक्ष सोडून निघून जातात. मात्र जे धाडसी आहेत, काँग्रेसच्या विचारसरणीशी जुळून आहेत आणि ज्यांच्यात देशभक्ती आहे, ते आजही काँग्रेसमध्येच आहेत. हजारो नेत्यांनी काँग्रेस सोडल्याचा दावा भाजपाने केला आहे, ते खोटे बोलत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस सोडून गेलेल्या बहुतांश नेत्यांचे सांगणे आहे की, राम मंदिर अभिषेक सोहळ्याला काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठी उपस्थित न राहिल्याने हा निर्णय घेतला. ही गोष्ट खरंच पक्षाला खटकत आहे का? यावर ते म्हणाले, हे लोक (काँग्रेस सोडून गेलेले) आपले गुन्हे आणि भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना केवळ निमित्त हवे होते. जेव्हा बाबरी मशीद संकुलातील राम मंदिराचे कुलूप उघडण्यात आले होते, तेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचीच सत्ता होती. त्यानंतर आम्ही अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचेही स्वागत केले. श्रीरामाच्या श्रद्धेबाबत प्रश्नच उपस्थित होत नाही. आम्हाला राम मंदिरात प्रार्थना करण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही प्रभू रामाचे अनुयायी आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहू.

हेही वाचा : भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

कमलनाथ आणि त्यांच्यातील मतभेदावर ते म्हणाले, मी त्यांच्या नामांकन रॅलीला गेलो, त्यांच्या समर्थनार्थ भाषणे केली. इतरही अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. छिंदवाडा कमलनाथ यांचा आणि वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपा गेल्या ४० वर्षांपासून छिंदवाडाबाबत बोलत आहेत. ते सर्व प्रयत्न करतील, मात्र काँग्रेसचाच विजय होईल, असे त्यांनी सांगितले.