पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीला अद्याप एक वर्षाहून अधिकचा कालावधी बाकी असताना भाजपानं राजस्थानमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून ते १७ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत भाजपाकडून राजस्थानातील सर्व २०० विधानसभा मतदारसंघामध्ये ‘जन आक्रोश यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘जॉइनिंग कमिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीमार्फत अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्याची योजना आहे.

२०२३ च्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, ही बाब लक्षात घेऊन भाजपानं ‘जन आक्रोश यात्रे’चं आयोजन केलं आहे. राजस्थानमधील एका भाजपा पदाधिकाऱ्याच्या मते, ‘जन आक्रोश यात्रे’ दरम्यान राज्यातील सुमारे ६०० हून अधिक नेते राज्यभर सक्रिय राहणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हा कार्यक्रम सुरू होणार आहे. जिल्हा स्तरावर १० दिवस हा कार्यक्रम राबवल्यानंतर ब्लॉक आणि गावपातळीवरही बैठका आणि आंदोलने केली जाणार आहेत.

हेही वाचा- “…तर ते सगळ्यात मोठे गुंड” नाना पाटेकरांचं स्पष्ट विधान, नेमकं काय म्हणाले?

‘जन आक्रोश यात्रे’मध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारच्या काळात घडलेली गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, तुष्टीकरणाचे राजकारण आणि भ्रष्टाचार आदि मुद्द्यांवर जोर दिला जाणार आहे. निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षाहून अधिकचा काळ आहे. त्यामुळे भाजपा राजकीय जमवाजमव करण्यासाठी नाही, तर राजस्थानमधील लोकांना गेहलोत सरकारच्या विरोधात उभे करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असंही संबंधित भाजपा पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा- “…तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला एकत्रित करून ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे”, गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जॉइनिंग कमिटी’मध्ये केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह राज्याचे नेते वासुदेव देवनानी असतील. यांच्याकडून इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहितीही सूत्रांनी ‘द हिंदू’ला दिली आहे.