राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर असताना शिंदे गटाचे उपनेते आणि आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना राजकीय चक्रव्यूहात गुंतविण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असून याला विट्यातील राष्ट्रवादीची मदत घेतली जात आहे. फाटी ओढून राजकारण करण्याचा इशारा देत आ. बाबर यांना आव्हान देण्यासाठी खासदार संजयकाका पाटील, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख ही भाजपची नेते मंडळी आघाडीवर आहेत. हजार-दीड हजार उंबर्‍याच्या गावातही नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करून शिवसेना आमदार बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत असून टेंभू योजनेचा जनक कोण असा सवाल करीत घेरण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ?

नगरपालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती यांच्या निवडणुका लांबल्याने आणि केव्हा होतील याची निश्‍चितता अद्याप नसल्याने राजकीय आघाडीवर शांतताच आहे. विधानसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची शक्यता वरिष्ठ पातळीवरून व्यक्त होत असल्याने राजकीय पातळीवर वादळापुर्वीची शांतता दिसत आहे. अन्य मतदार संघामध्ये राजकीय शांतता असली तरी खानापूर मतदार संघामध्ये खासदार आमदार यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजी सुरूच आहे.

हेही वाचा- “मित्रांची साथ, मित्रांचा विकास”, अदाणी प्रकरणावर प्रियांका गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

गेल्या आठवड्यामध्ये खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांच्या सत्काराचे आयोजन भाजप पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी आटपाडीचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी टेंभू योजनेचे जनक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या आमदार बाबर यांना टेंभू योजनेच्या मंजुरीचा इतिहास सांगत श्रेयवाद केला तर उणीदुणी निघणार असा इशारा दिला. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात दुष्काळी फोरमच्या निमित्ताने एकत्र आलेल्या गटातील पाच बंडखोर विजयी झाले होते. त्या पाच पांडवांच्या मुळेच टेंभू योजनेला तत्कालिन सेना भाजप सरकारने मंजुरी दिली असल्याची आठवण करून दिली.

हेही वाचा- तिसरी आघाडी भाजपाच्या फायद्याची! काँग्रेसच्या ठरावात भूमिका

तर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी आम्ही सत्तेला नमस्कार करणारे नाही असे सांगत दबावाचे राजकारण न करता सामान्य शेतकर्‍यांच्या हिताचे राजकारण करीत आलो असल्याचे सांगत नाव न घेता आमदार बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडले. याच व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांचीही उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत श्री. पाटील आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट एकत्रित लढण्याच्या तयारीत असतानाच खानापूरमध्ये मात्र सेनेला खिंडीत गाठण्यासाठी राष्ट्रवादीपेक्षा भाजपचे नेतेच अधिक आग्रही दिसत आहेत. यामागे मुख्य कारण नागेवाडीच्या यशवंत कारखान्याच्या मालकीहक्कावरून असल्याचे दिसत असले तरी व्यासपीठावर मात्र, नागेवाडीचे नावही न घेता टेंभू योजनेच्या श्रेयवादावरून आ.बाबर यांना चक्रव्यूहात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याला आमदार बाबर यांनीही चोख प्रत्युत्तर देत खासदार भाजपमध्ये आहेत का असा सवाल केला आहे. आम्हाला खोड्या करण्याची सवय नाही, संघर्ष आमच्या रक्तातच असल्याचे सांगत या राजकीय चक्रव्यूहाला भेदण्याची आपली तयारी असल्याचे सांगत लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे सूचित केले. मात्र, वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांशी आ. बाबर यांचे असलेले मधूर संबंध पाहता हे राजकीय व्यासपीठावरील हा वाद पेल्यातील ठरण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps ploy to put shinde group mlas in trouble print politics news dpj
First published on: 27-02-2023 at 12:35 IST