रवींद्र जुनारकर
चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सध्या जिल्ह्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. पण, या घडामोडी भाजपच्याच बाजूने जास्त घडताना दिसत आहेत. भाजपने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जनसंपर्क व बैठकांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ अपक्ष आमदार किशोर जोरगेवारही थेट मतदारांशी संपर्क साधत आहेत. काँग्रेस मात्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्यातील अंतर्गत लाथाळ्यांमुळे पिछाडीवर पडली आहे. तिकडे माजी खासदार नरेश पुगलियांनी वडेट्टीवार विरोधकांना एकत्रित आणत नव्या समीकरणाची तयारी सुरू केली आहे.
काय घडले-बिघडले?
येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. याची पूर्ण कल्पना सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना आहे. स्थानिक पातळींवर प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मेरा बुथ सबसे मजबूत, हा कार्यक्रम राबवून स्वत: मुनगंटीवार यांनी बुथ प्रमुखाच्या घरी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाच्या विषयावर बाबूपेठवासीयांशी थेट संवाद साधला.
त्या तुलनेत काँग्रेसमध्ये नुसत्याच अंतर्गत लाथाळ्या सुरू आहेत. जिल्हा बँकेतील नोकर भरतीला स्थगिती, प्रशासक नियुक्ती या विषयावरून वडेट्टीवार व धानोरकरांमध्ये अघोषित युद्ध सुरू आहे. परिणामी, धानोरकर समर्थक पदाधिकारी पालकमंत्री चंद्रपुरात आल्यानंतरही त्यांच्या कार्यक्रम व बैठकांना गैरहजर राहत आहेत. वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर व राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचा पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याविरोधात सूर आहे. काँग्रेसच्या बैठका नाहीत की आंदोलन नाही. वीज केंद्राने दिलेला ४ कोटी ८७ लाखांचा मालमत्ता कर बाबूपेठ उड्डाणपुलासाठी वळता करावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली. पालकमंत्र्यांनी या नामी संधीचे सोने करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले. आघाडी सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांनीही पालकमंत्र्यांना खनिज विकास निधीच्या मुद्यावरून लक्ष्य केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या माध्यमातून पुगलिया यांनी वडेट्टीवार विरोधक धानोरकर, मुनगंटीवार, अहीर व प्रतिभा धानोरकर यांना एकत्र आणले. स्थानिक स्वराज्य संस्थेत पाहिजे तितक्या प्रमाणात उमेदवारी मिळाली नाही तर नव्या समीकरणासह रिंगणात उतरण्याची तयारी पुगलियांची आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती मर्यादित आहे. तरीही अनुक्रमे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी आजी व माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशातून हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही प्रभागात वर्चस्व आहे. बहुजन समाज पक्षाचे महापालिकेत आठ नगरसेवक असले तरी आगामी निवडणुकांसाठी बसपाच्या नगरसेवकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातील दोन नगरसेवकांनी तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशही घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीची शक्तीही मर्यादित आहे. रिपाइंचे अनेक गट येथे सक्रिय आहेत. जोरगेवार यांनीही बाबूपेठ उड्डाणपुलाच्या माध्यमातून संपर्क अभियान आरंभिले आहे. त्यांनी यंग चांदा ब्रिगेडचे जाळे सर्वत्र पसरवले आहे. वरिष्ठ पातळीवर भाजप नेत्यांसोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्र्यांशीही मधुर संबंध जोपासले आहेत.
संभाव्य राजकीय परिणाम
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपविरोधातील नाराजीचा राजकीय लाभ मिळवण्याची पूर्ण संधी पालकमंत्री व खासदार असलेल्या कॉंग्रेसला आहे. याउलट आपल्या अंतर्गत मतभेदांचा लाभ विरोधकांना होऊ नये यासाठी भाजप पक्ष म्हणून व सुधीर मुनगंटीवार हे नेता या नात्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे अंतर्गत लाथाळ्यांमुळे दैव देत आणि कर्म नेते या म्हणीचा प्रत्यय कॉंग्रेसला येऊ शकतो.