महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदी मुखपत्र ‘’पांचजन्य’’ आणि संघाचे इंग्रजी मुखपत्र ‘’ऑर्गनाझर’’ यांच्या ताज्या साप्ताहिक अंकामध्ये (१० जुलै) महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्याची दखल घेतलेली असली तरी, आश्चर्यकारकरित्या संपादकीय टिप्पणी करण्यात आलेली नाही.

दोन्ही भाषांतील मुखपत्रांमध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करण्यात आले आहे. फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या तुल्यबळ राजकीय नेत्यावर एकदा नव्हे तर, दोनदा मात केली. राज्यसभा व नंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसचे सदस्य तसेच, अपक्षांनी भाजपच्या उमेदवारांना स्वपक्षाला अव्हेरून मतदान केले. ही फडणवीस यांची राजकीय खेळी पवारांना देखील समजली नव्हती, असे ‘’ऑर्गनाझर’’मधील लेखामध्ये नमूद करण्यात आले आहे.
या लेखामध्ये फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे. फडणवीस यांच्याकडे सत्ता नसतानाही त्यांची राज्यातील नोकरशहा तसेच, पोलीस खात्यातील एका गटावर पकड होती, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडामागे खरी ताकद फडणवीस यांचीच होती. सत्ता गेल्यावरही फडणवीसांनी अनेकांशी नाते टिकवून ठेवले. फडणवीस यांनी टीकाकारांना निरुत्तर केले आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून महाविकास आघाडी स्थापन केली. पण, राज्यात भाजपची सत्ता अपेक्षित होती. कायद्याने जी सत्ता फडणवीस व भाजपकडे असायला हवी होती, ती आता पुन्हा मिळाली आहे. फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहेत, असे मत लेखात व्यक्त करण्यात आलेले आहे.

सेनेचा नवा नेता-शिंदे
फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय ‘’मास्टर स्ट्रोक’’ असेही म्हटलेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या पूर्ण पाठिंब्यावर शिंदे सरकार राज्यात स्थापन झालेले आहे. एकनाथ शिंदे म्हणजे ‘’सेनेचा नवा नेता’’ अशी उपाधी देण्यात आली आहे. ‘’पांचजन्य’’च्या लेखानुसार, आता महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांची सत्ता आलेली आहे. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून भरकटले होते. पण, हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केली असून त्यांनी शिवसेनेतील घराणेशाही संपुष्टात आणली आहे. हिंदुत्वासाठी पहिले (बिगरहिंदुत्ववादी) सरकार सत्ताहिन झाले आहे! दोन्ही मुखपत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली आहे. उद्धव यांना शासन-प्रशासनाचा अनुभव नव्हता, ते कधी विधिमंडळाचे सदस्य नव्हते. त्यांनी मुख्यमंत्री होणे अनपेक्षित होते, त्यांना सत्तास्थापन करताना शरद पवारांच्या अटी मान्य कराव्या लागल्या होत्या. ते शिवसेनेच्या आमदारांनाही भेटत नव्हते. त्यांना पुत्र आदित्य ठाकरे यांची अधिक चिंता होती, असे नमूद करण्यात आले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत राजपूत, बॉलिवूडमधील अभिनेते-अभिनेत्री, बॉलिवूडशी संबंधित गुन्हेगारी आदींचा उल्लेख करून आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूडमधील अनेकांशी कसे संबंध होते, यावरही भाष्य करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुलासाठी बॉलिलूडमधील कथित अभद्र गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचा अप्रत्यक्ष आरोपही केला आहे.

फसलेला प्रयोग
महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग कसा फसला, यावरही मतप्रदर्शन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसवर सातत्याने टीका केली होती पण, त्याच काँग्रेसशी युती करून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. दोन काँग्रेसच्या संगतीत राहून उद्धव यांचे हिंदुत्व सौम्य झाले होते. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले पण, शिवसेनेचे नुकसान आधीच होऊन गेले होते. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिलेल्या धमक्याही निष्प्रभ ठरल्या. राऊत व आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक भाषेमुळे बंडखोर आणखी नाराज झाले होते. त्यांनी उद्धव यांना ‘’राऊत यांना आवरा’’, असेही सांगितले होते पण, त्यांचे उद्धव यांनी ऐकले नाही. मी कुठेही जाणार नाही, मी सेनाभवनावर शिवसैनिकांना भेटेन, असे उद्धव यांनी म्हटले असले तरी, आता वेळ निघून गेली आहे, अशी टिप्पणीही लेखांमध्ये करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even out of power devendra fadnavis has good hold on bureaucracy and police print politics news amy
First published on: 05-07-2022 at 20:02 IST