जळगाव – जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे ‘मविआ’ आधीच नैराश्याच्या गर्तेत सापडली होती. त्यातच काही प्रमुख नेत्यांनी महायुतीत प्रवेश केल्याने, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अधिकच कोलमडली आहे. कार्यकर्त्यांमध्येही कमालीची अस्वस्थता पसरली असून, पक्षाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता वाढली आहे. अशा स्थितीत नेमके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्याने ‘मविआ’ समोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने ३३, राष्ट्रवादी काँग्रेसने १६, शिवसेनेने १४ आणि काँग्रेसने चार जागा स्वतंत्र निवडणूक लढवून जिंकल्या होत्या. अर्थात, सत्ता स्थापनेवेळी भाजपसह शिवसेनेने सोयीनुसार युती करून जिल्हा परिषदेसह १५ पंचायत समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. काँग्रेससह राष्ट्रवादीला पाच वर्षे विरोधी बाकावरच बसावे लागले. शिवसेनेसह राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता दोन राजकीय पक्षांची संख्या, पर्यायाने स्पर्धा यंदा वाढणार आहे. विशेष म्हणजे महायुतीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्तेमध्ये वाटेकरी राहणार आहे.
जिल्ह्याची स्थिती लक्षात घेता भाजप व शिंदे गटाच्या तुलनेत परवापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद तशी कमीच होती. मात्र, शरद पवार गटातून माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने अजित पवार गटाचे पारडे आता जड झाले आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील तीन निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्येही महायुती आणि मविआच्या घटक पक्षांमध्ये एकोपा राहण्याची शक्यता कमी दिसत आहे. युती न झाल्यास भाजप आणि शिंदे गटासाठी अजित पवार गट साहजिक डोईजड ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासकरून शिंदे गटासाठी अजित पवार गट डोकेदुखी ठरू शकेल. दुसरीकडे, महायुतीचे तिन्ही बलाढ्य घटक पक्ष स्वतंत्र लढले तरी, त्यांच्यापुढे टिकाव धरणे काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला आव्हानात्मक आहे.
जळगाव महापालिका तसेच चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, धरणगाव, भुसावळ, रावेर, यावल, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, नशिराबाद या नगरपालिकांच्याही निवडणुका आता होतील. पैकी जळगाव महापालिकेत २०१८ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. प्रत्यक्षात, शिवसेनेने नंतरच्या काळात काही नगरसेवक फोडून महापालिकेची सत्ता ताब्यात घेत भाजपला शह दिला होता. आगामी निवडणुकीतही युती न झाल्यास भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना (एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे), दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार व शरद पवार) आणि काँग्रेस, असे चित्र राहिल. मात्र, युती झाल्यास विशेषतः जळगाव महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाबरोबर वाटाघाटी करून अजित पवार गट आपली ताकद आजमाविण्याची शक्यता आहे.