मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी जोरदारी तयारी करत आहेत. अशातच आता भाजपाला आपल्यातल्याच प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागण्याची वेळ येणार आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (RSS) बाहेर पडलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून हा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. संघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी “जनहित” नावाचा पक्ष काढला असून भाजपा-काँग्रेस या दोन्ही पक्षांना पर्याय देणार असल्याचे पक्षाच्या संस्थापकांनी सांगितले आहे. जनहिततर्फे रविवारी (दि. १० सप्टेंबर) पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला २०० लोक उपस्थित होते.

भाजपा आपल्या मूळ विचारधारेपासून लांब चालली असून काँग्रेस आणि भाजपात आता काही फरक उरला नाही, असा आरोप करून २००७ साली आरएसएसच्या काही नेत्यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आक्रमक हिंदुत्व स्वीकारले असून भाजपाला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, हे विशेष. बजरंग दलाचा माजी नेता असलेला आणि बजरंग सेनेच्या संस्थापकाने काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या घटनेच्या तीन महिन्यांनंतर ‘जनहित’ची स्थापना करण्यात आली. बजरंग सेनेनेही भाजपाकडून भ्रमनिरास झाल्याचा आरोप केला आहे.

modi made 20-25 billionaire but we will make millions millionaires says rahul gandhi
द्वेषपूर्ण भाषण; पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
No option to Narendra Modi H D Deve Gowda JDS Karnataka Loksabha Election 2024
“विरोधी पक्षनेतेपदाचीही मान्यता नसलेली काँग्रेस सत्तेत काय येणार?” माजी पंतप्रधान देवेगौडांची टीका
Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

हे वाचा >> ‘भाजपा, संघाचा बजरंग दलाशी दुरान्वये संबंध नाही’ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचे विधान!

जनहितच्या स्थापनेनंतर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला. त्यांचेच जुने सहकारी (आरएसएस) असलेल्यांना जर नवीन पक्ष काढावा लागत असेल तर भाजपाकडून किती मोहभंग झाला आहे, याची प्रचिती येते. भाजपाला एकप्रकारे यातून आरसा दाखविण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पियुष बबेले (Piyush Babele) म्हणाले की, भाजपा भ्रष्टाचाराचे केंद्रस्थान झाल्यामुळे आता संघाच्या सदस्यांनाही भाजपाशी संबंध ठेवायचे नाहीत.

भाजपाचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले की, प्रत्येकालाच त्यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. भाजपा विकास आणि कल्याणाच्या आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहील. आणखी एका भाजपा नेत्याने सांगितले की, तुम्ही संघाला तुमच्यापासून वेगळे करू शकत नाही, संघ हृदयात आहे आणि तिथेच राहील. ते (संघाचे माजी प्रचारक) पक्षाच्या माध्यमातूनही संघाचाच विचार जनतेपर्यंत घेऊन जातील. ते कोणत्याही पक्षात गेले तरी अंतिमतः संघाचाच विचार पुढे नेतील.

जनहित पक्षाच्या सदस्यांनी सांगितले, “बजरंग सेनेप्रमाणे त्यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही. मुळात आमच्यासमोर हा प्रश्नच नाही. आम्ही मनाने राजकारणी नसून ‘मिशनरी’ आहोत. आम्ही काँग्रेस आणि भाजपासह जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही अपक्ष लढू.” आरएसएसचे माजी प्रचारक अभय जैन (६०) हे जनहितचे संस्थापक सदस्य आहेत. इंदूर येथील रहिवासी असलेले जैन इयत्ता चौथीत असताना संघात सामील झाले होते. अभियंता पदवी घेतल्यानंतर जैन यांनी राम मंदिराची चळवळ उभी राहण्याआधी भोपाळ येथे शाखा स्थापन केल्या. काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाविरोधात त्यांनी आंदोलन केले होते, असा दावा जैन करतात.

जैन यांनी सांगितले की, २००७ साली त्यांनी संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मी संघाचा मुक्त प्रचारक होतो. मला ज्या पद्धतीने समाजाची सेवा करायची होती, ती मी संघातून करू शकत नव्हतो. संघामध्ये प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केलेली असते. त्यामुळेच मला वाटले की, बाहेर पडून मी आणखी चांगले काम करू शकतो, अशी प्रतिक्रिया संघातून बाहेर पडल्यानंतर जैन यांनी दिली.

हे वाचा >> कर्नाटकच्या पराभवानंतर मध्य प्रदेश भाजपामध्ये चिंतेचे वातावरण; अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आव्हान कायम

जनहितचे आणखी एक संस्थापक विशाल (४५) म्हणाले, “मी विचारधारेसाठी संघात सामील झालो होतो, पण मला जाणवले की वैचारिक मार्गावरून आम्ही पथभ्रष्ट झालो आहोत. मला समाजासाठी भरपूर काही करायचे आहे. त्याशिवाय आमची काहीच राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. त्यामुळेच संघातून बाहेर पडण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता.” विशाल पुढे म्हणाले, “भाजपाकडे चांगली विचारधारा आहे, पण ते ती आचरणात आणत नाहीत. आम्ही अजूनही संघाच्या मूळ विचारधारेवर विश्वास ठेवतो आणि सार्वजनिक जीवनात त्याचा अवलंब करतो. यापूर्वी आम्ही पर्यावरणाचे प्रश्न, बेरोजगारी, दंगलीच्या खोट्या केसेस आणि शेतकऱ्यांशी निगडित प्रश्नांवर काम केले आहे. दुसरीकडे तुम्ही भाजपाकडे बघू शकता, ते धार्मिक स्थळांचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करत आहेत, हे व्हायला नको. आम्ही या विरोधात जोरदार आंदोलन केले.”

काँग्रेसनेही आता हिंदुत्वाच्या मार्गावर वाटचाल केल्याबद्दलही जैन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हिंदुत्व आता मुख्य प्रवाहात आले असून प्रत्येकालाच हिंदुत्वाचा कैवार घ्यायचा आहे. मग ते केजरीवाल असो किंवा कमलनाथ. पण, ते मते मिळवण्यासाठी हिंदुत्व स्वीकारत आहेत, हे खरे हिंदुत्व नाही.” तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलत असताना जैन म्हणाले की, आम्ही भाजपाचे मतदान घेऊ की नाही, याबाबत आम्हाला कल्पना नाही. आमचा पक्ष अतिशय छोटा असून भाजपासारख्या अवाढव्य पक्षाला आमच्यापासून घाबरण्याची काहीही गरज नाही, पण आम्ही प्रयत्न तर पूर्णपणे करू.