आसाराम लोमटे

परभणी: जो खासदार निवडून येतो तो पक्षद्रोह करतो ही परभणी लोकसभा मतदारसंघाची परंपरा…या कृतीला शिवसेनेत ‘गद्दारी’ असे नाव आहे. मात्र विद्यमान खासदार संजय जाधव यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून ही परंपरा मोडीत काढली. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघाच्या फितुरीच्या इतिहासाला छेद देत दोन वेळा खासदारकी मिळवलेले संजय जाधव आता यावेळी खासदारकीसाठी तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर पक्षद्रोह करणाऱ्यांमध्ये अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

Sangli Lok Sabha, Sangli,
सांगलीत काँग्रेस आमदारांची झाली पंचाईत
eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Loksatta Chavdi Happening In Maharashtra Politics News On Maharashtra Political Crisis
चावडी: ओ शेट.. भाषणबाजीच ग्रेट
purushottam rupala controvery bjp gujarat
गुजरातमध्ये भाजपा अडचणीत? काय आहे क्षत्रिय- दलित वाद?

मराठवाडय़ात शिवसेनेची लाट आल्यानंतर काँग्रेसचे बुरूज ढासळले. त्यात परभणीचाही समावेश होतो. १९८९ च्या निवडणुकीत प्रा. अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. काँग्रेसच्या रामराव लोणीकर यांचा पराभव करून ते ६५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक १९९१ मध्ये झाली. त्यात देशमुख शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले. पुढे केंद्रातले नरसिंह राव यांचे सरकार वाचविण्यासाठी त्यांनी पक्षाशी द्रोह केला. त्यांना १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध कोणतीच राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यावेळी राजकारणात नवख्या असलेल्या जाधव यांनी अशोक देशमुख यांचा दारुण पराभव केला. तब्बल एक लाखांचे मताधिक्य त्यांनी मिळवले होते. सन १९९८ चा अपवाद वगळता १९९८९, १९९१, १९९६, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ या निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपला हा बालेकिल्ला कायम राखला आहे.

हेही वाचा >>>राहुल गांधी यांच्या यात्रेच्या वातावरणनिर्मितीचा मुंबईत काँग्रेसला फायदा किती ?

लोकसभेच्या १९९८ च्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी शिवसेनेच्या जाधव यांचा सरळ लढतीत ४६ हजार मतांनी पराभव केला. पुढे लगेचच १९९९ मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. शिवसेनेतर्फे सुरेश जाधव, काँग्रेसतर्फे माजी मंत्री रावसाहेब जामकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वरपूडकर अशी तिरंगी लढत झाली. मतांचे विभाजन झाल्याने सुरेश जाधव यांना पुन्हा दिल्ली गाठता आली. अडीच लाख मते घेऊन त्यांनी विजय संपादन केला. जामकर यांना दोन लाख १० हजार आणि वरपूडकर यांना एक लाख ७९ हजार मते मिळाली.

१९८९ पासून सातत्याने लोकसभा व विधानसभेवर भगवा फडकत असल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला अशी राजकीय वर्तुळात परभणीची सर्वदूर ख्याती असली तरी पक्षद्रोहाचाही मोठा इतिहास या जिल्ह्याला आहे. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेने सुरेश जाधव यांना उमेदवारी नाकारली. त्या वेळी परभणीचे आमदार असणाऱ्या तुकाराम रेंगे यांना बढती मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा श्री. वरपूडकर यांना उमेदवारी दिली. रेंगे यांना तीन लाख ३९ हजार ३१८ व वरपूडकर यांना २ लाख ८३ हजार मते मिळाली. ज्या वरपूडकर यांनी सरळ लढतीत १९९८ मध्ये विजय मिळविला त्यांनाच २००४ ची सरळ लढत पेलवली नाही. २००८ साली पक्षादेश झुगारून केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानास अनुपस्थित राहुन रेंगे यांनी शिवसेनेशी पक्षद्रोह केला. आपली पक्षात घुसमट होत असल्याचे जाहीर करून त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली.

हेही वाचा >>>आगामी लोकसभा निवडणुकीत ‘या’ १० राज्यांवर सगळ्यांचे लक्ष, कोण मारणार बाजी?

खासदार फुटीचा शाप असलेल्या शिवसेनेने २००९ साली अनोखा प्रयोग केला. निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा ईतिहास असलेल्या शिवसेनेने पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकरानांच उमेदवारी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले सुरेश वरपूडकर हे केवळ सक्रिय राजकारणातच नव्हे तर मंत्रीपदावर होते. तरीही तब्बल वीस वर्षाच्या राजकीय वनवासानंतर दुधगावकरांनी विजय संपादन केला. खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर शिवसेनेपासून फटकून राहू लागले. एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी मंठा येथे गेल्यानंतर त्यांच्या वाहनावर शिवसेनेच्याच पदाधिकार्यांनी दगडफेक केली होती. या कृत्याची दखल घेवून संबंधित पदाधिकार्याविरूध्द शिवसेना कारवाई करील असे दुधगावकरांना अपेक्षित होते. तसे न झाल्याने दुधगावकरांनी ‘खासदारकी महत्वाची नाही, स्वाभिमान महत्वाचा’ अशी भुमिका घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

खासदार जाधवांचा अपवाद

२०१४ साली लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी विजय संपादन केल्यानंतर पुन्हा २०१९ साली पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली आणि या निवडणुकीतही ते विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत जागोजागी बंडखोरी झाली वा अनेक नेते ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्याबरोबर गेले. पण जिल्ह्यात खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे दोघेही मोठे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघ हा तीन, साडेतीन दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना हा लोकसभा मतदारसंघ स्वीकारत नाही हा दीर्घ इतिहास आहेच पण खासदार जाधव यांनी पक्षाशी असलेली निष्ठा जपली आणि आजवरची गद्दारीची परंपरा मोडीत काढली. पक्षानेही खासदार जाधव यांना उपनेतेपदी स्थान देऊन त्यांच्या निष्ठेचे मोल केले.