पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचा प्रचार रंगात येत असतानाच वरिष्ठ नेत्यांच्या मानापमान नाट्यामुळे शहर काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी आमदार विश्वजीत कदम हे सांगलीच्या उमेदवारीमध्ये अडकून पडल्याने त्यांनाही पुण्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने गट-तट विसरून सर्वांना एकत्र आणणार कोण? हा प्रश्न काँग्रेसपुढे निर्माण झाला आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर काँग्रेसला उर्जितावस्था आणून देणारा उमेदवार मिळाला असतानाही रुसव्या-फुगव्यांनी प्रचाराची धार बोथट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुण्यातील काँग्रेसला विजय मिळवून देणारा उमेदवार आतापर्यंत लाभलेला नाही, प्रत्येक निवडणुकीत लाखांच्या फरकाने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होत आला आहे. मात्र, धंगेकर यांच्या माध्यमातून काँग्रेसला विजयाची आशा निर्माण झाली असतानाच, वरिष्ठ नेत्यांच्या मानापनाचा फटका प्रचाराला बसू लागला आहे. धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आळस झटकून कामाला लागल्याचे दिसत असतानाच वरिष्ठ नेत्यांमुळे प्रचाराला खीळ बसली आहे. त्यात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

हेही वाचा : “स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?

धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतही जोशी यांनी धंगेकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यानुसार प्रचाराला रंगत येत असतानाच काही वरिष्ठ नेत्याचे हेवेदावे हे काँग्रेसच्या प्रचाराचा वेग मंदावण्यास कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष माजी नगरसेवक अरविंद शिंदे हे आहेत. दोन आठवड्यांपूर्वी केसरीवाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यातून ते बाहेर पडले होते. त्यावरूनही काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी एक माजी आमदार आणि पदाधिकाऱ्याची शाब्दिक चकमक झाली होती. वरिष्ठ नेत्यांच्या वादात काँग्रेसमध्ये मात्र दुफळी निर्माण झाली आहे. धंगेकर, जोशी हे शहरात गाठीभेटी घेऊन प्रचाराचा वेग वाढवत असताना अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट

पुणे शहराच्या प्रभारीपदी विश्वजीत कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत निर्माण झालेल्या वादामुळे त्यांना पुण्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे प्रचाराला आता कमी कालावधी राहिला असताना रुसवे- फुगवे दूर करून सर्वांना एकत्र आणणार कोण? असा प्रश्न काँग्रेस पुढे निर्माण झाला आहे.